अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चेची शक्यता

नवी दिल्ली्- अन्न सुरक्षा विधेयकावर बुधवारी लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतल्या आपल्या खासदारांसाठी काँग्रेसने व्हीप जारी केला आहे. संसदेत हजर राहणे आणि मतदान करण्यासंबंधीचा हा व्हीप आहे. लोकसभेत मंगळवारपासूनच विधेयकावर चर्चा सुरू झाली. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावर तेलगु देसम पक्षाने केलेल्या गोंधळामुळे चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे बुधवारी या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेत चर्चेला सुरुवात करण्याची शक्यता आहे. संसदेतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी संसदेत पहिल्यांदाच संबोधित करतायेत असे नाही. याआधी १३ मे २०१२मध्ये संसदेच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या विशेष चर्चेतही सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या.

मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावून सरकारने राजकीयदृष्ट्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांसोबतच अन्नसुरक्षा विधेयकावर सहमती घडवून आणली. परंतु, भाजपने उपस्थित केलेले रॉबर्ट वद्रा प्रकरण आणि त्यानंतर तेलगू देसमच्या खासदारांनी लोकसभेचं कामकाज वेठीस धरल्याने मंगळवारी हे विधेयक बारगळले. लोकसभेत प्रचंड गोंधळामुळे तब्बल पाच वेळा कामकाज तहकूब करावे लागले. गोंधळाचा फटका अन्नसुरक्षा विधेयकाला बसत असल्याने हा तिढा सोडविण्यासाठी कमलनाथ यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

Leave a Comment