‘‘नॉक नॉक एन्टरटेन्मेंट’’ च्या बॅनरखाली भरत जैन, कल्पेश जैन निर्मित ‘‘हॅलो..नंदन! चित्रपटाचे शुटिंग नुकतेच हडपसर येथील ग्रीन सीटीत पार पडले. यावेळी चित्रपटाच्या टिमची माझापेपरच्या प्रतिनिधीने भेट घेतली असता सांगण्यात आले की, ‘‘विजय असो’’ नंतर येणारा दिग्दर्शक राहुल जाधव यांचा ‘‘हॅलो..नंदन! ‘‘जर मोबाईल हरवला..तर?’’ अशा कथेवर बेतलेला आहे. मोबाईलचे आपल्या जीवनातील स्थान अग्रगण्य आहे. तो नसेल तर अस्वस्थ व्हायला होते. पण त्यातूनच काही थरार नाट्य ही घडू शकते. या आणि अशाचं कथेवर ‘‘हॅलो..नंदन! असल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली.
‘‘झपाटलेला 2’’ च्या यशानंतर आदिनाथ कोठारे कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणि स्वत: आदिनाथलाही याची जाण असल्याने तो ही वेगळ्या पण चांगल्या भूमिकेच्या शोधात होता. त्याचा हा शोध या चित्रपटातील नंदन च्या भूमिकेपाशी येऊन थांबला आहे. एक वेगळी आणि सक्षक्त भूमिका करायला मिळत असल्याबद्दल तो समाधान व्यक्त करतो. ‘‘अर्जुन’’ मालिकेद्वारे घराघरात पोहचलेला गोड चेहरा म्हणजे मृणाल ठाकूर. ‘‘हॅलो..नंदन! द्वारे ती रजत पडद्यावर पदार्पण करीत असून मोठ्या पडद्यासाठी मिळत असलेला कामाचा अनुभव आनंददायी असल्याच ती सांगते.
‘‘हॅलो..नंदन! ची कथा, पटकथा सौरभ भावे यांची असून दिग्दर्शनाबरोबरच छायाचित्रणाची जवाबदारी पार पाडत आहेत राहुल जाधव. चित्रपटातील गीतांना श्रवणीय संगीत दिलंय अमित राज यांनी.