भारतीय हद्दीत चीनची पुन्हा घुसखोरी

नवी दिल्ली – हिंदी-चीनी, भाई – भाईचा नारा गेल्या काही वर्षापासून देत आहोत. मात्र, ते भाई गेल्या काही दिवसापासून चीनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसखोरी करत आहेत. चीनच्या 100 सैनिकांनी 16 जुलै रोजी पुन्हा एकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन भारताच्या हद्दीत प्रवेश केला. यावेळी पहिल्यांदाच चिनी सैनिकांनी स्वतःसोबत इंग्रजी भाषेतला बॅनर आणला होता. या बॅनरमध्ये चिनी सैनिकांनी भारतालाच गो बॅक असे सांगितले. जिथे आम्ही उभे आहोत ती आमचीच जागा आहे, भारताने या भूमीवरुन चालते व्हावे अशा स्वरुपाचा संदेश चिनी सैनिकांनी भारताला दिला.

घुसखोर चिनी सैनिक दोन दिवस लडाखमध्ये भारताच्याच हद्दीत थांबले आणि 18 जुलैला परत निघून गेले. या कालावधीत भारत आणि चीनचे समोरासमोर उभे होते. मात्र चिनी सैनिकांवर गोळीबार करण्यासाठी केंद्र सरकारकडून आदेश मिळाला नाही. त्यामुळे घुसखोर चिनी सैनिक बेधडकपणे भारताच्या हद्दीत तब्बल दोन
दिवस वावरत होते. याआधी दोन आठवड्यापूर्वी चिनी सैनिकांनी भारतात घुसखोरी केली होती. त्यावेळी चिनी सैनिकांनी भारताच्या सैन्याने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते. तत्पूर्वी 15 एप्रिल रोजी पीपल्स लिबरेशन आर्मीने (चिनी सैनिक) एक तुकडीच भारताच्या हद्दीत दहा किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केली होती.

वर्षभरात चीनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अनेकदा भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. प्रत्येकवेळी भारताने आक्रमक भूमिका घेणे टाळले. अरुणाचल प्रदेशमध्ये राहणा-या भारतीयांना स्टेपल्ड व्हिसा देणे, स्वतःच्या नकाशात भारतीय भूभाग दाखवून ती जमीन आपलीच असल्याचा दावा करणे असे प्रकराही चीन सातत्याने करत आहे. चीनच्या आक्रमक भूमिकेवर भाजपने टीका केली आहे. केंद्राने चीनप्रश्नी कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. काँग्रेसने मात्र सरकार योग्य मार्गाने हा प्रश्न सोडवत आहे, चीनचा मुद्दा भावनिक करू नये, असे सांगितले. चीन भूतानसह भारतीय उपखंडातील सर्वच देशांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी संबंधित देशांना आर्थिक मदत करणे, स्वस्तात शस्त्र पुरवठा करणे असे पर्याय वापरले जात आहे. भारताच्या शेजारी देशांवर चीनची पकड मजबूत झाल्यास भारतासाठी पूर्वेकडची सीमा सुरक्षित ठेवणे खूपच कठीण जाणार आहे. त्यामुळे चीनच्या आक्रमकतेला कठोरपणे उत्तर द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी केली आहे.