रांझणाः

या आठवड्यात रिलीज झालेल्या ’रांझणा’ या सिनेमातून प्रेमाचा एक वेगळा रंग आपल्या समोर येतो. सोनम कपूर आणि धनुष यांच्या अभिनयाने ’रांझणा’ खूप इंटरेस्टिंग बनला आहे.

थोडक्यात कथा सांगायची तर कुंदन (धनुष) हा बनारसमध्ये राहणारा मुलगा. तो बनारसच्या बाजारात झोया (सोनम कपूर)ला बघतो त्याचवेळी त्याला ती आवडते. तिला बघण्यासाठी तो रोज तिचा पाठलाग करत असतो. तो झोयाला त्याच्या प्रेमाबद्दलही सांगतो. सुरूवातीला झोया त्याच्या या प्रेमाला नकार देते, मात्र तरीही कुंदनचे तिच्याबद्दलचे प्रेम काही कमी होत नाही. या दोघांमधील हे संबध पुढे चालू राहू नयेत म्हणून झोयाचे आईवडिल तिला शिक्षणासाठी दिल्लीला पाठवतात.

झोया उच्च शिक्षणासाठी दिल्लीला निघून जाते आणि कुंदन मात्र बनारसमध्येच राहतो. दिल्लीला तिची भेट होते अक्रम(अभय देओल) याच्याशी. झोया आणि अक्रम एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. त्यातून ओळख होऊन त्या दोघांचे प्रेम जमते. ८ वर्षानी झोया पुन्हा आपल्या गावी म्हणजेच बनारसला येते. त्यावेळी कुंदन (धनुष) ला प्रचंड आनंद होतो. तो झोयाला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाविषयी विचारणार त्याआधीच झोया त्याला तिच्या आणि अक्रमच्या प्रेमाविषयी सांगते. कुंदन हे ऐकून फार निराश होतो. आणि यानंतरच सुरुवात होते ती रांझनाच्या ख-या गोष्टीला. मुख्य तिन्ही पात्रे जरी एकाच भावनेने गुंतलेली असली तरी यात प्रेमाचा त्रिकोण नाही.

या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आनंद एल रॉय. आनंदने अतिशय भावनात्मक पद्धतीने हा प्रेमाचा विषय मांडलाय. दिग्दर्शकाने खूपच सुंदर पद्धतीने या चित्रपटाचे चित्रण केले आहे ज्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात. यातील सर्व भूमिका दिग्दर्शकाने फारच सुंदर पद्धतीने फ्रेम केल्या आहेत. प्रेक्षकांवर छाप पाडणारे यातील संवादही उत्तम आहेत.

या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ए आर रेहमान यांच संगीत. त्यानी संगीतबद्ध केलेली गाणी प्रेक्षकांना आवडतील यात शंकाच नाही. ’पिया मिलेंगे’, ’तुम तक’ ही गाणी आधीच हिट ठरली आहेत. बनारसची एक पावन संस्कृती असल्याने त्यात रंगासोबत संगिताचाही वाटा महत्वाचा ठरतो. याला रेहमानच्या संगिताने पूर्ण न्याय दिला आहे.

धनुषने आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात बाजी मारली आहे. पारंपरिक अभिनेत्यांच्या पठडीतले त्याचे व्यक्तीमत्व नसलं, तरीही त्याचा अभिनय लोकांना आवडून जातो. सोनम कपूरनेही धनुषला चांगली साथ दिली आहे. सोनम कपूर आणि धनुष यांचा निरागसपणा प्रेक्षकांना भावून जातो. अभय देओल यानेही त्याच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलाय.

हा चित्रपट जरी पूर्णपणे प्रेमकथेवर आधारित नसला तरी एक हटके असा हा चित्रपट आहे. एक मनाला भावणारा सुंदर चित्रपट बघण्यास वेगळे कारण शोधण्याची गरज नाही.

Leave a Comment