तिरंगी मालिकेत टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव

किंगसटन- तिरंगी मालिकेत टीम इंडियाला सलग दुस-या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मंगळवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा तब्बल १६१ धावांनी पराभव झाला. श्रीलंकेने दमदार फलंदाजी करत टीम इंडियासमोर ३४९ धावांचा डोंगर रचला होता. हे आव्हान पेलताना टीम इंडियाची पुरशी दमछाक झाली. त्यामुळे मालिकेतील आव्हान टीकून राहण्यासाठी टीम इंडियाला पुढील सामना जिंकणे गरजेचे आहे.

कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुखापतग्रस्त धोनीच्या गैरहजेरीत विराट कोहली टीम इंडियाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळत आहे. श्रीलंकेने दमदार फलंदाजी करत डावखूरा फलंदाज विपूल तरंगाने १५९ चेंडूत नाबाद १७४ धावांची तुफानी खेळी केली. सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी २१३ धावांची भागिदारी केली. भारताच्या गोलंदाजांनी चाहत्यांना निराश केले.

३४९ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचे फलंदाज धावसंख्या वाढविण्याच्या घाईत बाद होताना दिसले. कर्णधार कोहलीनेही निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियातुन अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला सर्वाधिक म्हणजे फक्त ४९ धावा करता आल्या. इतर सर्व फलंदाज अर्धशतकही गाठू शकले नाहीत व संपुर्ण संघ १८७ धावांत तंबूत परतला. तिरंगी मालिकेतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव असून मालिकेच्या क्रमावारीत भारत तिस-या स्थानावर आहे. टीम इंडियाचा पुढील सामना यजमान वेस्ट इंडिज संघाविरुद्ध रंगणार आहे.

Leave a Comment