पाटणा, दि.19 – भारतीय जनता पक्षापासून अलिप्त झाल्यानंतर अल्पमतात आलेल्या बिहारमधील नितीश कुमार सरकारने अपेक्षेप्रमाणे आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेतील 126 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करत नितीश कुमारांवर विश्वास दाखवला, तर 24 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. भाजपने मात्र, नितीश यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करत सभात्याग केला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नरेंद्र मोदी यांच्या हाती सर्व सूत्रे सोपविल्याने अस्वस्थ झालेल्या संयुक्त जनता दलाने रविवारी भाजपप्रणित एनडीएशी घटस्फोट घेतला. त्याचवेळी नितीश कुमार यांनी त्यांच्या सरकारमधील भाजपच्या 11 मंत्र्यांना निलंबित केले. भाजप सरकारबाहेर पडल्याने आपोआपच नितीश यांचे सरकार अल्पमतात आले होते. या घडामोडींची दखल घेत बिहारचे राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी नितीश कुमार यांना विश्वासदर्शक ठराव आणण्याचे निर्देश दिले होते. सरकार तरण्याची खात्री असलेल्या नितीश यांनी राज्यपालांच्या सुचनेनुसार आज विधानसभेत विश्वास ठराव मांडला.
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नितीश कुमार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करत भाजपच्या 91 सदस्यांनी सभात्याग केला. भाजपच्या अनुपस्थितीत ठरावावर झालेल्या मतदानात नितीश यांनी सहज बाजी मारली. राष्ट्रीय जनता दलाच्या 22 व 2 अपक्षांसह 24 आमदारांनी त्यांच्याविरोधात मतदान केले. तर 126 आमदारांनी सरकारला पाठिंबा दर्शवला.