दूध दरवाढीचा दणका

dudh
महाराष्ट्रात दुधाचे दर वाढविण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे ते वाढले तर शेतकर्‍यांना दुधापोटी चार पैसे जास्त मिळणार आहेत. कारण त्याला अशा दिलाशाची गरजच आहे. महाराष्ट्राच्या तीन चतुर्थांश भागाला भीषण दुष्काळाचा फटका बसला आहे. त्यामुळे चारा महागला आहेे. पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक शेतकर्‍यांची दुभती जनावरे गुरांच्या छावण्यांमध्य बांधलेली आहेत. तिथे त्यांची व्यवस्था चांगली होत नाही. विशेषतः संकरीत गायींचे तिथे फार हाल होतात. या गायी भरपूर दूध देत असल्या तरी त्या उन्हाला आणि उकाड्याला फार संवेदनशील असतात आणि फार वेळ उन्हात बांधल्यास त्यांच्या दुग्धोत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे राज्यातले दुधाचे उत्पादन घटले आहे. परिणामी सर्वच शेती उत्पादनाप्रमाणे दुधाचे दर वाढणेही अपरिहार्य ठरले आहे. तसे तर दुधाचे भाव सतत वाढत आलेलेच आहेत. पण यावेळी होणारी दरवाढ मोठी असेल असा संकेत या संबंधात काल झालेल्या बैठकीतून मिळाला. म्हशीचे दूध लीटरमागे सहा रुपयांनी तर गायीचे दूध लीटरमागे चार रुपयांनी महागेल असे दिसते. साधारणतः दुधाचे दर वाढले की शहराचे दुधाचे ग‘ाहक नाराजी व्यक्त करतात. कारण त्यांचेही जगणे महागाईने असह्य झालेले आहे. परंतु शेवटी शेतकर्‍यांचेही खर्च वाढत चाललेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढत्या खर्चानुसार दूधाचे दर वाढणे अपरिहार्य आहे. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली तरी दुधाचे दर वाढतच असतात. परंतु यावेळी होणारी वाढ फार मोठी आहे आणि त्यामुळे ग‘ाहक खूप वैतागणार आहेत. महाराष्ट्रातला दुधाचा दर सहकारी आणि खाजगी दुग्ध व्यवसायिक संस्था मिळून ठरवत असतात.

राज्यात सुसंघटितपणे होणार्‍या दुग्ध संकलनाचे आणि वितरणाचे प्रमाण दररोज एक कोटी लीटर एवढे आहे. त्यातले 50 लाख लीटर दूध सहकारी संस्थांतर्फे संकलित केले जाते तर उर्वरित 50 लाख लीटर दूध खाजगी संस्था संकलित करून वितरण करत असतात. त्यामुळे या संस्था एकत्रित येऊन दुधाचे भाव ठरवतात. त्यात मनमानी करता येत नाही. निदान सहकाराचा संबंध असल्यामुळे तरी दरवाढीचे स्पष्टीकरण द्यावे लागते आणि सर्व गोष्टींचा खुलासा केल्याशिवाय दुधाची दरवाढ केली जात नाही. म्हणजे म्हशीच्या आणि गायीच्या दुधामध्ये होणारी अनुक‘मे होणारी सहा आणि चार रुपयांची वाढ का केली जात आहे. याचे पुरते स्पष्टीकरण केले जाणार आहे. तेव्हा. लोकांना दरवाढ असह्य वाटली तरी ती तर्कशुध्द असेल सध्या दुष्काळी भागात कडब्याची एक पेंडी किमान 12 ते 15 रुपयांना विकली जात आहे. एखादी दुभती गाय सांभाळायची असेल तर दिवसाकाठी तिला 60 ते 70 रुपयांचा नुसता कडबाच खाऊ घालावा लागतो. त्याशिवाय पशुखाद्य, पेंड, भुस्सा, यांचा खर्च वेगळाच. त्यामुळे शेतकरीसुध्दा दुभती जनावरे सांभाळण्याचा खर्चापायी मेटाकुटीस आलेले आहेत. त्यांना जर आता वाढत्या खर्चानुसार दरवाढ मिळाली नाही तर त्यांची दुग्धोत्पादनातली रुची कमी होईल आणि दुधाचे उत्पादन घटेल. तसे झाल्यानंतर तर दुधाचा दर आणखीनच वाढेल त्यामुळे आता त्याला दरवाढ दिली पाहिजे ज्यातून तो या व्यवसायात टिकेल.

महाराष्ट्रातला सगळाच दुधाचा पुरवठा दुध संघाच्या मार्फतच होतो असे नाही. अनेक शेतकरी आणि शहरातले बिगर शेतकरी दुग्धोत्पादक ग‘ाहकांना थेट दूध विकतात. अशा विक‘ेत्यांनी तर फारच पूर्वीपासून आपल्या मनाला येईल तसा दर वाढवून लीटरमागे 40 रुपयांपर्यंत नेला आहे आणि दुधाचा पुरवठा कमी झाल्यामुळे लोकसुध्दा नाइलाजाने काहोईना पण या दरात दूध खरेदी करत आहेत. त्यामुळे तोच न्याय शेतकर्‍यांनाही लागू करायचा असेल दूध संघांच्याही दुधाची दरवाढ अटळ आहे. पण शेतकर्‍यांच्या कोणत्याही मालाची अशी दरवाढ करताना त्या दरवाढीतला किती हिस्सा शेतकर्‍यांच्या पदरात पडतो हा मोठाच कळीचा मुद्दा असतो. कारण आता हे सगळे दूध संघ दुधाचे भाव 40 आणि 30 रुपयांवर नेऊन ठेवणार आहेत. पण त्यातला फार कमी हिस्सा शेतकर्‍यांच्या पदरात पडणार आहे.

सध्या दूध संघांतर्फे म्हशीच्या दुधाला 23 रुपये आणि गायीच्या दुधाला 17 रुपये दर दिला जातो. आता त्यामध्ये दरवाढ होणार असली तरी त्यातले सहा रुपये पूर्णपणे शेतकर्‍यांच्या पदरात पडणार नाहीत. म्हणजे दुधाच्या खरेदीचा दर 23 वरून 29 रुपये होणार नाही आणि गायीचा दरसुध्दा 17 वरून 21 रुपये होणार नाही. या दरवाढीतला काहीना काही हिस्सा दूध संघांना मिळणार आहे. कारण त्यांचेही खर्च वाढलेले आहेत. संकलन, प्रकि‘या, पॅकिंग अणि वितरण या सर्व गोष्टींवर त्यांनाही खर्च करावा लागत असतोच परंतु महाराष्ट्रामध्ये दुधाचा खरेदी दर आणि विक‘ीचा यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि दुधाचे दर वाढले तरी शेतकर्‍याना मिळणारा दर कमीच असतो. या दोन्हीतला फरक हा दूध संघाचा खर्च असतो हे कबूल. पण तो लीटरमागे किती यावा याचे काही मान ठरलेले नाही. दूध संघाचा खर्च म्हणून संघ जास्तच पैसे घेतो. तेव्हा दूध संघांनी दरवाढ करताना शेतकर्‍यांनासुध्दा न्याय मिळेल असा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा दरवाढ होईल पण शेतकरी आहे तिथेच राहील. महाराष्ट्रामध्ये धवलक‘ांती झालेली आहे पण ती देशातल्या हरितक‘ांतीसारखीच केवळ उत्पादन वाढीतच झालेली आहे. ती शेतकर्‍यांनासुध्दा फलदायी ठरली पाहिजे.

Leave a Comment