चेन्नईतील सामने दिल्लीला हलविले

नवी दिल्ली – आगामी काळात चेन्नईमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंना खेळू न देण्याच्या भूमिकेवर तमिळनाडू सरकार ठाम आहे. त्यामुळे येत्या काळात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील पहिला क्वालिफायर सामना; तसेच एलिमिनेटर सामना चेन्नईहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सामने चेन्नईहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय शनिवारी आयपीएल समन्वयकाच्या बैठकीनंतर घेण्यात आला.

या सामन्यांची ठिकाणे बदलण्याचा निर्णय आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ल यांनी जाहीर केला. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २१ मे रोजी चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर पहिला ‘ क्वालिफायर ‘ सामना, तर २२ मे रोजी ‘ एलिमिनेटर ‘ सामना होणार होता. आता हे सामने ठरलेल्या दिवशीच दिल्लीतील फिरोझशाह कोटला स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत .

दरम्यान, चेन्नईतील सामन्यांना पर्यायी ठिकाण म्हणून बेंगळुरू आणि पुण्यातील स्टेडियमचाही विचार या बैठकीवेळी घेण्यात आला होता; परंतु त्याबाबत चर्चा करून अखेर हे दोन्ही सामने दिल्लीला खेळवण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment