गंभीर- कोहलीत झाली बाचाबाची

बंगळुरू – आयपीएल सामने म्हटले की वाद आलेच. आता पर्यंत एकदापण ही स्पर्धा वादाशिवाय पार पडली नाही. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या सहकारी खेळाडूमध्येच अनेकवेळा जुंपली आहे. त्यातच गुरुवारी एम.चेन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे काहीकाळ मैदानावर तणावाचे वातावरण होते.

दोन्ही संघामध्ये सामना सुरु झाल्यानंतर दहाव्या षटकादरम्यान दोघात वाद झाला. लक्ष्मीपथी बालाजी गोलंदाजी करत असताना कोहलीने प्रदीप सांगवानच्या षटकात दोन षटकार ठोकले होते. परंतु बालाजीच्या चेंडूवर मार्गनने कोहलीला टिपले. कोहली तंबूत परतत असताना केकेआरचा खेळाडू विकेट सेलिब्रेट करत असताना अचानक कोहली मैदानात थांबला. त्याच्या चेहर्‍यावर तेव्हा राग दिसत होता. त्यानंतर गंभीर देखील काही तरी बडबडत त्याच्याकडे जात होता. दोघेही आक्रमक झाले होते. त्यावेळी केकेआरचा खेळाडू रजत भाटियाने मध्यस्थी करून दोघांना शांत केले.

रणजी क्रिकेटमध्ये गंभीर,कोहली दिल्ली संघाकडून खेळतात. त्यांच्यात झालेल्या वादात मध्यस्थी करणारा रजत भाटिया हा देखील दिल्लीतील आहे. सध्या विराट कोहली टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. तर गंभीर देखील यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार होता. धोनीनंतर गंभीरला कर्णधार पद मिळण्याची शक्यता आहे. परंतु कदाचित गंभीरला कोहली हा अडसर ठरू शकतो. त्यामुळेच हा वाद झाला असावा अशी चर्चा याठिकाणी रंगली होती.