मुंबई दि.६ – मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायायलाने सुनावलेली पाच वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा माफ करण्यात यावी तसेच माफ केली जाऊ नये यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे आत्तापर्यंत ६० विनंती अर्ज आले असून हे सर्व अर्ज राज्याच्या गृह विभागाकडे पुढील मत घेण्यासाठी पाठविले गेले असल्याचे समजते. असे अर्ज करणार्यांत सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच खासदार, राजकीय पक्ष नेते, कांही संस्था यांचाही समावेश आहे.
राज्यपालांचे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी हे सर्व अर्ज शासनाच्या गृह विभाग अतिरिक्त सचिवांकडे ४ एप्रिल रोजी पाठविले आहेत. अशा प्रकारे अर्ज येणे ही नित्याची बाब असल्याचे सांगून अधिकारी म्हणाले की संजयची शिक्षा माफ होऊ नये आणि शिक्षा माफ व्हावी अशा दोन्ही बाजूंनी विनंत्या या अर्जातून केल्या गेल्या आहेत. शिक्षा माफ व्हावी यासाठी माजी न्यायमूर्ती काटजू, समाजवादीचे नेते अमरसिग, खासदार जयाप्रदा यांच्यासारख्यांचा जसा समावेश आहे तसा सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे.
या साठ अर्जामधील २५ अर्ज संजय दत्तची शिक्षा माफ केली जाऊ नये म्हणून आलेले असून ते देशाच्या सर्व भागातून आलेले आहेत असेही समजते.