पुणे: हैदराबाद बॉम्बस्फ़ोटाच्या तपासाबाबत तपास यंत्रणा अद्याप अंधारात चाचपडत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावरील नियण्तर्ण ही तपासा आणि सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठे आव्हान असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘माझा पेपर’शी बोलताना दिली.
हैदराबाद येथे रेकी केल्याचे अटकेत असलेल्या दहशतवाद्यांनी कबूल केले असले तरीही प्रत्यक्षात हैदराबाद बॉम्ब स्फोटाचे नियोजन, आखणी कोणी केली, बॉम्ब कोणी बनविले आणि कोणी पेरले हे तपास यंत्रणांना आजता गयात समजलेले नाही. केवळ या कटात स्थानिक लोक सहभागी नव्हते. हैदराबादपासून चार- पाच तासांच्या अंतरावरून येऊन दहशतवाद्यांनी स्फ़ोट घडविले. त्यासाठी गुरुवारी हैदराबादेत भरणार्या जुन्या बाजारातून जुन्या सायकली विकत घेतल्या गेल्या आणि त्याचा वापर बॉम्ब पेरण्यासाठी केला; एवढ्या जुजबी माहितीवर तपासयंत्रणांची गाडी अडली आहे.
हैदराबाद बॉम्बस्फोटाबाबत गुप्तचर यंत्रणांनी पूर्वसूचना दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सांगत असले तरीही ही पूर्वसूचना अत्यंत मोघम स्वरूपाची होती. अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासातून अशा प्रकारे ‘रेकी’ केलेली चाळीस ते पन्नास ठिकाणे उघड झाली असून त्याबद्दलची माहिती त्या त्या राज्यांचे दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) आणि संबंधित पोलीस उपयुक्त यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे.
गुप्तचर यंत्रणा, तपास यंत्रणा, स्थानिक पोलीस यांच्यात समन्वयाच्या अभावाचे जुने दुखणे तपास यंत्रणांना जडलेले आहे. त्यामुळे गुपचार यंत्रणांनी सुस्पष्ट सूचना देऊनही संपूर्ण देशाला वेठीस धरणारा २६/११ चा दहशतवादी हल्ला रोखणे किंवा किमान नियंत्रित करणे कोणत्याही शासकीय सुरक्षा यंत्रणेला शक्य झाले नसल्याकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी लक्ष वेधले
सध्याच्या कळत माहिती तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असल्याने साध्याच्या युगाला ‘इंटरनेट युग म्हटले जाते. या माहिती तंत्रज्ञानाच्याच जोरावर भारत जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र दहशतवादी आणि गुन्हेगारही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करीत आहेत. सुरक्षा यंत्रणांसमोर ही बाब एक मोठे आव्हान बनून राहिली आहे. उदाहरणार्थ पुण्यातील साखळी बॉम्ब स्फोटाचे संपूर्ण नियोजन आणि संचालन मोबाईलवरून इंटरनेट सुविधा प्रदान करणार्या निम्बूझ या प्रणालीद्वारे करण्यात आले. यावर नियंत्रण कसे ठेवणार हा सुरक्षा यंत्रणांसमोर यक्ष प्रश्न आहे.
पोलादी भिंती आडचा चीनच नव्हे तर व्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणार्या अमेरिकेतही प्रत्येकाच्झा व्यक्तिगत ई मेल अथवा एसएमएस सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून जात असतो.मोबाईल अथवा संगणकावरून होणार्या संशयास्पद किंवा आक्षेपार्ह संवाद अथवा माहितीच्या आदान प्रदानावर सुरक्षा यंत्रणांची नजर असते. त्यामुळेच ट्विन टोवर्सवरील हल्ल्यानंतर पुन्हा दहशतवादी हल्ला अमेरिकेत झाला नाही. भारतात मात्र ही यंत्रणा उभारण्यासाठी हजारो कोटीचा निधी आणि तज्ज्ञ मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.