नवी दिल्ली दि.२३ – पहिली चार सीटर इलेक्ट्रीक कार सोमवारी सादर केल्यानंतर कंपनीचे चीफ ऑफ ऑपरेशन्स आर. चंद्रमौली यांनी महिंद्रा पुढील दोन ते तीन वर्षात इलेक्ट्रीक कारची आणखी किमान चार ते पाच मॉडेल्स बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. महिंद्र रेवा या नावाने ही नवी कंपनी सुरू असून इलेक्ट्रीक कारमध्ये एक मॉडेल चार दरवाजे असलेले असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
बंगलोरच्या कंपनीतील मोठा स्टेक महिंद्रा अॅन्ड महिंद्राने घेतल्यानंतर रेवा आय- रेवा इलेक्ट्रीक कार कंपनीने नामकरण आता एमआरइव्ही असे करण्यात आले आहे. रेवा २००१ ला बाजारात आली त्यानंतर कंपनीने ४७५० गाड्या विकल्या आहेत. नवी इ-२० आरइव्ही आय हा आकडा एक वर्षाच्या कालावधीतच पार करेल असा विश्वासही यावेळी चंद्रमौली यांनी व्यक्त केला.
नव्या कारचे मुख्य ग्राहक हे टेक सॅव्ही असतील असे सांगून ते म्हणाले की ज्यांच्याकडे पहिली एक कार आहे अशा २५ ते ४० वयोगटातील वर्ग आम्ही ग्राहक म्हणून नजरेसमोर ठेवला आहे कारण आमच्या ज्या कार भारतात विकल्या गेल्या त्यातील ३० टक्के ग्राहक हा पहिली एक कार असलेला आहे. नवी पिढी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार चटकन करते असेही ते म्हणाले.
ही इलेक्ट्रीक कार १५ अॅपिअरच्या प्लग पॉईंटवर चार्ज करता येणार आहे आणि त्यासाठी कंपनीने सध्या दिल्ली आणि बंगलोर शहरात १०० चार्जिंग पॉईंट उभारले असून लवकरच देशाच्या अन्य शहरांतूनही ही सुविधा दिली जाणार आहे. मोबाईल ज्याप्रमाणे घरात अथवा कामाच्या ठिकाणी चार्ज करता येतो तसेच ही कारही कामाच्या जागीही चार्ज करता येईल असेही सांगण्यात आले आहे.