परीक्षांमध्ये अडथळा करणा-यावर गुन्हे दाखल करा

मुंबई- राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये बाधा उत्पन्न करणा-या शिक्षक संघटनांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि कुलगुरूंना दिले आहेत. या निर्णयामुळे ऐन परीक्षा काळात आंदोलनाचा पवित्रा घेणा-या शिक्षक संघटनांचे धाबे दणाणले आहेत.

त्यासोबतच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांच्या परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाच्या कुलसचिवांवर राहणार असून केंद्रप्रमुख म्हणून महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी परीक्षांचे नियोजन करण्याचे कठोर निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

कायम विनाअनुदानित, हंगामी, कंत्राटी शिक्षक, नेट, सेट उत्तीर्ण विद्यार्थी तसेच तासिका तत्त्वांवरील शिक्षकांकरवी परीक्षा घ्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठीही हंगामी, कंत्राटी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.

Leave a Comment