नागपूर: यापूर्वी देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये नागपुरातून स्फोटके गेल्याचे अनेकदा तपासादरम्यान समोर आले आहे . काही महिन्यांपूर्वी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांकडून तब्बल ८० डिटोनेटर्स जप्त केले होते. त्यामुळे या हैदराबाद स्फोटाचे नागपूर कनेक्शन आहे का, याच्या सखोल तपासाला सुरूवात झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
हैदराबादला हादरा देण्यासाठी दहशतवाद्यांनी अत्यंत सुनियोजितपणे कट आखला होता. दिलसुखनगर येथील अत्यंत गजबजलेल्या कोणार्क थिएटर अथवा कोतापेठ बाजारात हा स्फोट घडविण्याची त्यांची योजना होती. मात्र टाइमिंग चुकल्याने स्फोट अन्यत्र झाला. या स्फोटाला दहशतवाद्यांनी ‘मिशन डीईएसएचएमयूकेएच’ असे नाव दिले होते; अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे . २१ फेब्रुवारीला बॉम्बस्फोट घडविल्यानंतर याच दिवशी दहशतवादी संघटनेने फेसबुकवर पेज तयार केले. त्यातही याचा उल्लेख आहे.
दिलसुखनगर येथीला बॉम्बस्फोटाची जबाबदारी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेनेच हे कृत्य केलाचा दाट संशय गुप्तचर यंत्रणेला आहे. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दहशतवादी संघटनांनी दिली होती. त्याच्या मृत्यूच्या १३ व्या दिवशीच दिलसुखनगर येथे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला होता.
याच दिवशी फेसबुकवर ‘बॉम्बस्फोट देशमुख हैद्राबाद मिशन कम्पलिट इंडियन मुदाहिदीन’ या नावाने पेज टाकण्यात आले होते. त्याला लाईकही मिळाला होता. हे पेज कोणी अपलोड केले; ते कोठून अपलोड करण्यात आले; याचा तपास गुप्तचर यंत्रणा करीत आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास गुप्तचर यंत्रणांनी नकार दिला.
‘मिशन डीईएसएचएमयूकेएच’चा उलगडा असा-
डी- दिलसुखनगर, ई- ईस्ट, एस- साऊथ, एच- हैदराबाद, एम- मुजाहिद्दीन, इंग्रजी अद्याक्षरांमध्ये एम हे अक्षर १३ व्या क्रमांकावर आहे. यू हे अक्षर २१ व्या क्रमांकावर येत असल्याने २१ ही तारीख निश्चित करण्यात आली. के- कोणार्क अथवा कोतापेठ, एच- दिलसुखनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर आहे. लोकेशनसाठी हायवे चा एच दर्शविण्यात आला असावा .
या बॉम्ब स्फोटांची ‘मोडस ऑपरेंडी’ ‘आझमगढ मॉडेल’शी तंतोतंत जुळणारी आहे. गजबजलेल्या ठिकाणी सायकलवर स्फोटके लादून स्फोट घडवून आणण्यात इंडियन मुजाहिद्दीन तरबेज आहे. ही पद्धत ‘आझमगड मॉडेल’ म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली, वाराणसी, गोरखपूर, जयपूर, अहमदाबाद , पुणे आणि हैदराबादेतील दिलसुखनगर येथे याच पद्धतीने साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता .
या डिकोडींगमुळे दहशतवाद्यांच्या पुढील नियोजनाचे अंदाजही बांधण्यात येत आहेत. इस्लाम धर्मात मृत्यूनंतर ४० व्या दिवसाला महत्व असते; तर हिंदू धर्मात १३ व्या दिवसाला. २१ फेब्रुवारीला स्फोट घडविल्यानंतर आता अफजलच्या फाशीनंतर ४० व्या दिवशीही घातपात होण्याची शक्यता आहे. हा दिवस १९ मार्चला येतो. त्यामुळे तो धोक्याचा ठरू शकतो; अशी शक्यता लक्षात घेऊन गुप्तचरयंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत.