भारताचा बदला घेण्याची पाक दहशतवाद्यांची धमकी

इस्लामाबाद: कुख्यात दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीचा सूड उगविण्यासाठी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले करण्याचा इशारा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी दिला आहे.

गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाकिस्तानात ठिकठीकाणी शोकसभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी एका शोकसभेत काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ करण्याचा इशारा देण्यात आला. या सभेचे आयोजन युनायटेड जिहाद कौन्सिलच्या वतीने करण्यात आले. यावेळी लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहोम्मद, अल बद्र, जमायत उल मुजाहिदीन, हरकत उल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी भारताच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर नारेबाजी करण्यात आली.

पाकिस्तानच्या राजधानीत बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांनी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्याची चार वर्षातील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी लाहोर आणि रावळपिंडी या ठिकाणी अशा शोकसभा आयोजित करण्यात आल्या. गुरूच्या फाशीबद्दल आम्ही नक्कीच भारतावर सूड उगवू; अशी दर्पोक्ती जमायतचा नेता मुफ्ती असगर याने केली आहे; तर काश्मीर समस्येवर जिहादच्या माध्यमातूनंच मार्ग निघू शकतो; असे सैय्यद अल्लाउद्दीन याने सांगितले.

Leave a Comment