दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशात संतापाचा आगडोंब उसळला तरीही बलात्कार आणि विनयभंगाची प्रकरणे उघडकीस येण्याचे गेल्या काही दिवसात थांबलेले नाही. महिलावरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेदिवस वाढच होत आहे. गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पहिला असता छेडछाडीचे हे लोन ग्रामीण भागापर्यंत पोचले आहे. येत्या काही दिवसात अशा घटनावर आळा घालण्यासाठी कठोर कायदा करायला हवा. किमान छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.
काही दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात अशाच छेडछाडीच्या घटनांमुळे संतापाचे वातावरण पसरले आहे. पारगाव (जि. उस्मानाबाद) येथील पाचवीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीने रोडरोमिओंच्या जाचाला कंटाळून रूई येथील घरात रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना नुकतीच घडली. यात ती मुलगी ७० टक्के भाजून उपचार घेत असताना मरण पावली. त्यानंतर असाच एक प्रकार येडशी ( जि. उस्मानाबाद) येथे घडला. ३१ डिसेंबरच्या रात्री काही टवाळखोर गुंडांनी जनता कॉलेजमधील काही मुलींची नावे रस्त्यावर लिहिली आणि दुस-या दिवशी वर्गातील फळ्यावरही त्यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवला. या प्रकाराला घाबरून त्या मुलींनी कॉलेजात येणेच बंद केले. या प्रकरणात येडशी येथील सहा रोडरोमिओंना ताब्यात घेतले होते ; मात्र त्यांना विचारपूस करून सोडून देण्यात आले.
येडशीच नव्हे तर भारतातली अनेक खेडी , ग्रामीण भागापर्यंत ही छेडछाड , विनयभंग यांचे प्रमाण पूर्वापार होते आणि त्यात वाढच होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पोलिसांचा अशा प्रकरणांकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोण आणि या प्रकाराची वाच्यता केल्याने आपलीच अब्रू जाईल या भीतीपोटी गप्प बसणारे पालक होत.
ग्रामीण भागात गावगुंडांचे टोळके कॉलेजच्या अथवा शाळेच्या गेटवर उभे असल्याचे चित्र सर्रास दिसते. एखाद्या मुलीचा सतत पाठलाग करणारा , ती जाईल तिथे तिची टेहळणी करणारा , तिच्यावर नजर रोखून धरणारा तरुण त्या मुलीच्या मनात कायमचीच पुरुषाविषयीची दहशत निर्माण करत असतो. अशा दहशतीखाली बालमन आणि कौमार्य गुदमरून गेलेल्या असंख्य मुलींनी शाळा अथवा कॉलेजला कायमचा रामराम ठोकला आहे. यात त्या मुलीने पालकांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला , तर तिलाच दोषी धरून कोंडून ठेवणे , मारहाण करणे असे प्रकार घडतात. पोलिसांपर्यंत तक्रार न्यावी तर पोलिस आपल्याच अब्रूचा आधी पंचनामा करतील , ही भीती पालकांच्या मनात असते. पुढे जाऊन , त्या मुलीच्या लग्नाचा विचार त्यांना घायाळ करत असतो. अशावेळी तक्रार द्यायला गेलेल्या पालकांना पोलिस दादच देत नाहीत ; कारण पळून गेलेल्या मुलीने गुपचूप प्रेमविवाह केला असणार , असे ते गृहीतच धरतात , असा अनुभव आहे. याचा परिणाम गुंडांचे मनोबल वाढण्यात होतो आणि असे गुन्हे घडतच राहतात.
येडशीतील घटनेमधील अटक केलेल्या सहा आरोपींना जुजबी चौकशी करून सोडून दिल्याने ते पुन्हा मोकाट सुटण्याची आणि पुन्हा असेच गुन्हे अधिक निर्ढावून करण्याची शक्यता आहे. या गुंडांचा मोठा प्रभाव वयात येणा-या मुलांवर होतो. आज छेडछाडीच्या घटनांत अल्पवयीन मुलेच आघाडीवर असल्याचे उघड झाले आहे.
अशा घटना सतत घडत असल्याने आता तरी सरकार जागे होऊन महिलावर अत्याचार करणा-यावर कडक कारवाई करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा घटनावर आळा घालण्यासाठी भविष्यात कठोर कायदा करायला हवा. किमान छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आजामीनपात्र गुन्हा दाखल केला तरच महिला सुरक्षित राहू शकतील.