पाक लष्कराच्या कारवायाही हाफीज सईदच्या इशाऱ्यावर

नवी दिल्ली: युद्धबंदीचा करार न जुमानता भारतीय सैनिकांवर गोळीबार करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यासाठी कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याने प्रवृत्त केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. सीमेवर अशांतता निर्माण करून भारतात दहशतवादी घुसविण्यासाठी सईद प्रयत्न करीत असून भारतात पुन्हा घातपाती कृत्य घडविण्याचा त्याचा डाव असल्याचे गुपचार यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.

रविवारी पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी दोघा भारतीय सैनिकांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्याचे अमानुष कृत्य केले. यावरून भारतात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना घडण्यापूर्वी एक आठवडा सईद याने पूंछ विभागातील सीमावर्ती भागाला भेट दिली होती. या भेटीत त्याने सीमेवरील पाक सैनिक आणि सीमेवर कार्यरत असलेल्या दहशतवादी तळांना भेटी देऊन त्यांना भारताची कुरापत काढण्यास भडकाविल्याची माहिती गुप्तचरांच्या हाती लागली आहे. भारतात अतिरेकी घुसविण्यासाठी दहशतवादी संघटना आणि पाक लष्कर सीमेवर एकत्रित कारवाया करीत असल्याचे या माहितीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेने सईद याला दहशतवाद्यांच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत समाविष्ट केले असून त्याला पकडण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी १ कोटी डॉलर्सचे ईनाम जाहीर केले आहे. असे असूनही सईद पाकिस्तानात धर्मगुरूचा मुखवटा धरण करून राजरोसपणे वावरत आहे. इतकेच नव्हे; तर पाक सैन्याची सूत्रे देखील त्याच्या सांगण्यावरून हलविली जात असल्याचे दिसून आले आहे.

सध्या भारत पाक सीमेवरील नियंत्रण रेषेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानने सन २००३ मध्ये युद्धबंदी करार करूनही पाकिस्तानच्या सैन्याने सीमेवर अनेकदा आगळीक घडविली आहे. भारतीय सैनिकांची हत्या आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना होण्यापूर्वी हाफीज सईद पूंछ भागात आला असून सीमावर्ती भागात काही गडबड होण्याची पूर्वसूचना देण्यात आल्याचा दावाही गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.

Leave a Comment