नागपूर: अहमदनगर जिल्ह्यातील चार घोटाळ्यात अनेक राजकीय पक्षांचा सहभाग असून या घोटाळ्याची राज्य अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी; अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दगडी येथे एकनाथ पाटील सेवाभावी संस्था, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संगनमताने चार छावणीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले. केवळ पंधरा दिवसाच्या कालावधीत चौकशी पूर्ण करून अहवाल सदर केला जाईल; अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
दरम्यान; औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद येथील पाणी टंचाईकडे तावडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या जिल्ह्यात भूजल साठे ३ टक्क्यांहून कमी झाले असून १३६ तालुक्यात ७५ टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. सुमारे २० लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरणीच होऊ शकलेली नाही. त्यामुळे यावर्षी धान्याचे उत्पादन ४४ टक्क्यांनी तर कडधान्याचे उत्पादन २६ टक्क्यांनी घटणार असल्याचा दावा तावडे यांनी केला.