मुले, देवाघरची फुले

आपल्या देशातली आताची पिढी पालकांचा मार खात, गुरुजींच्या छड्या खात मोठी झालेली आहे. त्या काळात छडी लागे छम छम, विद्या येई घम घम,  ही तर म्हणच होती. छड्या मारून कोणी सुधारत नाही असे आता म्हटले जायला लागले आहे आणि मुलांना सन्मानाने वागवले पाहिजे हा विचार व्यक्त केला जायला लागला आहे. मुलांना घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी शिक्षा करणे हा  गंभीर अपराध समजला जात आहे. आपल्या मुलाच्या शिक्षकांनी त्याला मारता कामा नये असे बर्यािच पालकांना वाटते परंतु शाळेत शिक्षा झाल्याशिवाय मुलांना ज्ञान येणार नाही असाही विचार करणारा एक वर्ग आपल्या समाजात आहे. त्यामुळे सरकार शिक्षेच्या विरोधात जे कायदे करते त्यांच्याबाबत प्रतिकूल टीका टिप्पणी करणारा एक वर्ग आहेच. पूर्वीच्या काळी शिक्षक फार मारत असत एवढेच नव्हे तर वेताच्या छडीने मुलांना फोडून काढत असत आणि तीच पध्दत योग्य होती असे म्हणणारे अविचारी लोक अजूनही आपल्या समाजात आहेत.

असा विचार करणारे शिक्षक हे तर विद्यार्थ्यांचे शत्रूच ठरलेले आहेत.  कोणत्याही सुधारलेल्या देशामध्ये मुलांना शिक्षा करणे बंद झालेले आहे. अमेरिकेत तर मुलांना शिक्षा करणारे शिक्षकच काय पण मुलांचे आईबाप सुध्दा शिक्षेस पात्र ठरतात. आईवडीलांनी आपल्या मुलांना मारणे हा सुध्दा अमेरिकेत गुन्हा ठरतो. या सगळ्या सुधारणांमागे एक मुलभूत कल्पना आहे आणि ती विसरल्यामुळे काही लोकांचा शिक्षेविरुध्दच्या कायद्याविषयी गैरसमज होतो. लहान मूल मग ते कितीका असमंजस असेना ते स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. त्याचा स्वतःचा अभिमान असतो. त्याला स्वतःला एक अस्मिता असते. त्याच्या परीने ते स्वतःविषयी विचार करत असते. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे हे पालकांचे आणि शिक्षकांचे कर्तव्य असते. परंतु प्रत्येक मुलगा बिघडणाराच असतो, तो खोडकरच असतो, तो वाया जाणाराच असतो त्यामुळे त्याला सरळ करणे हेच आपले काम आहे असा काहीसा विपरित विचार हे पालक आणि शिक्षक करत असतात.

एखाद्या ओढाळ जनावराला ताब्यात ठेवण्यासाठी जसा चाबुक वापरावा लागतो तसा मुलासाठी चाबुक वापरला नाही तर ते मूल वाया जाईल आणि सतत चाबकाने फोडून काढले किवा नजरेच्या जरबेत ठेवले तरच तो चांगला नागरिक होईल अशी या लोकांची मध्ययुगीन कल्पना असते. एखादा पालक किंवा शिक्षक मुलाला मारतो आणि आपण त्याच्या भल्यासाठीच शिक्षा केलेली आहे. असा स्वतःच्या मनाचा समज करून घेतो खरे म्हणजे हा त्याचा गैरसमज असतो. मुलगा बिघडण्याची शक्यता असतेच परंतु तो बिघडू नये यासाठी अनेक अहिंसक उपाय असतात आणि त्या उपायांनी मुलांना सुधरवणे यात त्या पालकांचे आणि शिक्षकांचे कौशल्य सामावलेले असते.

पण त्याऐवजी हे लोक मुलांना मारत सुटतात हे त्याच्या कल्याणाचे काम नसते तर अहिसक पध्दतीने मुलाला सुधरवण्यातील त्यांची असमर्थता त्यात व्यक्त होत असते. त्यामुळे ज्या पालकांना किवा शिक्षकांना मुलांना मारावेसे वाटते त्यांनी मुलाच्या बाबतीत विचार करण्याऐवजी स्वतःच्या बाबतीत विचार केला पाहिजे आणि आपण चांगला पालक किवा चांगला शिक्षक होण्यास पात्र आहोत की नाही या बाबतीत आत्मपरीक्षण केले पाहिजे.

पाठीवर आपल्या स्वतःच्या आकारापेक्षा मोठी आणि स्वतःच्या वजनापेक्षा अधिक वजनाची पोती घेऊन जाणारी लहान लहान मुले पाहिली की त्यांची कीव येते. शिक्षणाच्या नावावर आपण त्यांच्यावर किती ओझी लादत आहोत याचा आधीच्या पिढीने कधी विचारच केलेला नाही आणि या सगळ्या ओझ्यांमधून मुलांचे व्यक्तिमत्व घडावे अशी अपेक्षा आपण करत आहोत. खरे म्हणजे ही लहान मुले व्यक्तिमत्वे राहीलेली नसून ओझी वाहणारी गाढवे झालेली आहेत. मात्र त्यांचे हे ओझे कमीत कमी कसे होईल याचा प्रयत्न कोणीही गांभीर्याने करत नाहीत. हा शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा आहे. ज्याच्यासाठी शिक्षण आहे त्या कोवळ्या मुलांचे मन आणि त्यांचे शरीर, बुध्दी एवढ्या गोष्टींचा विचार सोडून ही शिक्षण पध्दती राबविली जात आहे. ती पाहिली म्हणजे मनापासून म्हणावेसे वाटते शिक्षणाच्या आयचा घो.

नॉर्वेत नोकरी निमित्त गेलेले एक भारतीय  दांपत्य तिथल्या एका  कायद्यामुळे अडचणीत आले आहे. या कायद्याचा भंग केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले तर त्यांना सव्वा ते दीड वर्षे तुरुंगाची हवा खायला जावे लागेल.  पण हे भारतीय दांपत्य ज्या कायद्यामुळे अडचणीत आले आहे तो कायदा नॉर्वेत आणि भारतात एवढा  भिन्न आहे की ज्या कृत्याबद्दल  तिथे एवढ़ी शिक्षा होत आहे ते कृत्य भारतात कोणी साधा अपराधही मानायला तयार होणार नाही. अपराध काय तर त्यांनी आपल्या मुलाला धमकावले. आपल्या मुलाला म्हणजे आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला धमकावले. तो अंथरुण ओले करीत होता. कितीही सांगून त्यात काही सुधारणा होत नव्हती.  शेवटी वैतागून या नवरा बायकोने त्याला भारतात परत पाठवून देण्याचा धाक घातला.

या धाकाने घाबरलेला या मुलाने (वय ८ वर्षे) आपल्या शिक्षिकेला हे सांगितले आणि तिने पोलिसांना कल्पना दिली. त्यातून हे प्रकरण उद्भवले. आपल्या देशात आई वडलांनी मुलांना शिक्षा करणे हा काही अपराध मानला जात नाही. उलट ते आपल्या मुलाला त्याच्या भल्यासाठीच शिक्षा करीत असतात असे मानले जाते मग तो अपराध मानणे तर दूरच.     म्हणून नॉर्वेतल्या या प्रकाराने भारतातल्या अनेक पालकांना नवल वाटेल. भारतात अजून ती स्थिती आलेली नाही.

Leave a Comment