तिसऱ्या कसोटीसाठी संघात बदल नाही

मुंबई: भारत आणि इंग्लंड संघांमध्ये होणाऱ्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सध्याचा संघ कायम ठेवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. पाठीला दुखापत झालेला वेगवान गोलंदाज उमेश यादव या सामन्यातही खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी अशोक दिंडा याची संघात वर्णी लागली आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यातील मुंबई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची कागदावर वाघ असणारी फलंदाजांची फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळली. भारतीय गोलंदाजांची कामगिरीही सुमार दर्जाची झाली. त्यामुळे पाहुण्यांसाठी लावलेल्या फिरकीच्या सापळ्यात भारतीय संघाचीच पुरती बेअब्रू झाली. या पार्श्वभूमीवर निवड समितीच्या मंगळवारच्या बैठकीवर क्रिकेट प्रेमींची नजर लागून राहिली होती. मात्र संघात कोणतेही महत्वपूर्ण बदल न करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.

भारत आणि इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना दि. ५ डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या टी-२० सामान्यांसाठीचा संघ नंतर जाहीर केला जाणार आहे.

तिसऱ्या कसोटीचा भारतीय संघ – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, अशोक दिंडा,प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, इशांत शर्मा, मुरली विजय, जहीर खान