हरिद्वारला भारताच्या सातव्या तीर्थस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. चीनी तीर्थयात्री ह्यू एन त्सग भारतात आला तेव्हा त्याने हरिद्वारला मयूर असे संबोधले. हे शहर गंगा नदीच्या किनारी वसले आहे. ईश्वराचे द्वार मानले जाणारे हरिद्वार मोक्ष मिळविण्याचेही द्वार आहे अशी भारतीयांची श्रद्धा आहे. प्रत्येक जण हरिद्वारमध्ये गंगा स्नान करून आपल्या पापांचे क्षालन करू इच्छितो. आजही श्रद्धा, आस्था आणि विश्वासाने लोक हरिद्वारला जातात. धार्मिक स्थळ असण्याबरोबरच हरिद्वार चार धामांपैकी एक मानले जाते.
दंतकथेनुसार राजकुमार भागीरथने पूर्वजांना पूनर्जीवित करण्यासाठी तपस्या केली होती. अखेर भगवान शिवाच्या जटेमधून गंगेचा उदय झाला. त्यामुळे राजाच्या ६० हजार पुत्रांचा पुनर्जन्म झाला. त्यानंतरच हरिद्वारला देशाच्या सात पवित्र स्थळांत समाविष्ट करण्यात आले.
ईश्वराच्या या नगरीत चोहीकडे विखुरलेले नैसर्गिक सौंदर्य आणि सुगंध भक्ताना आकर्षित करतो. गुलाबांचा सुगंधाने भरलेले पाणी आणि सायंकाळची आरती डोळ्यात भरते. हरिद्वारमध्ये मंदिरेही खूप आहेत. मनसा देवी मंदिर, चंद्रा देवी मंदिर आणि दक्ष महादेव मंदिर. येथे राजा दक्षने एक यज्ञ केला होता. मात्र त्याने शिवजीला बोलावले नव्हते. नाराज शिवजीने दक्षाचा वध केला होता. मात्र नंतर स्वतः ईश्वरानेच त्याला जिवंत केले होते.
हरिद्वारला जाऊन सकत आश्रम आणि सकत सरोवराचे दर्शन घेतले नाही तर ही धार्मिक यात्रा अपूर्ण ठरते. सकत सरोवर म्हणजे जेथून गंगा सात छोट्या-छोट्या नद्यांत विभागली जाते. लोकांच्या मते, यामागेदेखील एक कथा आहे. असे सांगितले जाते की, एकदा सात ऋषि एकत्र तपस्या करीत होते आणि गंगेला पुढे जायचे होते. मात्र ऋषींची तपस्या भंग होऊ नये यासाठी ती सात सहायक नद्यांत विभागून वाहू लागली.
हरिद्वारची सायंकाळदेखील अत्यंत मोहक आणि पवित्र असते. सूर्यास्तानंतर लोक ’हर की पौडी’जवळ एकत्र होतात. राजा विक्रमादित्याने आपल्या भावाच्या स्मरणात ही बांधली होती. सायंकाळी सात वाजता वातावरण मंत्रांनी भारावून जाते. चारही बाजूला अनेक दिवे पेटतात.काही लोक मंत्रोच्चारण करतात तर काही या मोहक वातावरणात हरवून जातात. हे मंत्र संपताच हजारो दिवे गंगा नदीत तरंगताना दिसतात.
असे सांगतात की, अमृत मिळवण्याच्या इच्छेने देवता आणि दानवांनी समुद्र मंथन केले होते तेव्हा त्यातून निघालेल्या अमृताने अमर होण्याची दोघांचीही इच्छा होती. नंतर धन्वंतरी जेव्हा अमृत कलश घेऊन पळाला तेव्हा देवता आणि दानवांचे भांडण झाले. दरम्यान अमृताच्या कलशातून चार थेंब जमीनीवर सांडले. त्यातून चार धाम- हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैनचा जन्म झाला. या ठिकाणी १२ वर्षाला एकदा कुंभमेळा आणि दरसहा वर्षाला अर्धकुंभमेळा भरतो. असे मानले जाते की या मेळ्यादरम्यान कोणी गंगेत डुबकी मारली तर त्याच्या सर्व पापांचे क्षालन होते. हरिद्वारला जाण्यासाठी कुठल्याही कारणाची गरज नाही. कधीही जावे. मनाच्या शांततेसाठीदेखील जाऊ शकता. हे ईश्वराचे द्वार आहे. जिथे मानवाला पुण्याबरोबरच आत्मिक शांतता मिळते आणि सायंकाळच्या आरतीच्या प्रकाशात आपले जीवन उजळून निघते. जीवनाचा अंधःकार या दिव्यांच्या प्रकाशातून नाहीसा होतो. काही वेळासाठीच का होईना माणसाच्या मनातील सच्चा माणूस जागृत होतो.