सपचे ‘एकला चलो रे’

कोलकाता: आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष कोणत्याही आघाडीबरोबर किंवा डाव्या, उजव्या पक्षांबरोबर न जाता स्वबळावर मैदानात उतरेल. तिसर्‍या आघाडीबाबत निवडणुकीनंतर विचार केला जाईल; असे सपचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी स्पष्ट केले.

येथे आयोजित करण्यात आलेल्या सपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले असून त्यामुळे त्यांचा जनाधार घटला आहे; असे मुलायम यांनी सांगितले. विशेषत: सत्ताधारी काँग्रेस वर त्यांनी टीकेची झोड उठविली. देशात महागाई गगनाला भिडली असताना सरकार निष्क्रिय आहे. अन्न धान्याचा पुरेसा साठा असतानाही साठेबाज धान्याची साठेबाजी करून महागाई वाढवित आहेत. मात्र सरकार कमकुवत असल्याने ते साठेबाजांवर धाडी टाकू शकत नाही की कारवाई करू शकत नाही; असे मुलायम म्हणाले.

भारतीय जनता पक्षही कमकुवत झाला असून सप कोणाच्याही वळचणीला न जाता स्वतंत्रपणे आपली ताकद अजमावेल; असेही मुलायम यांनी सांगितले.

Leave a Comment