नवी दिल्ली दि.७- मंगळवारी गुगलने भारतात बहुप्रतिक्षित व्हॉईस नेव्हीगेशन सेवा सुरू केली असून ही अँड्राईड बेस स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर उपलब्ध झाली आहे. ही सेवा विनाशुल्क असून त्याचा फायदा वाहनचालक, प्रवासी तसेच पायी जाणार्या पादचार्यांनाही होणार आहे.
वाहन चालविताना अथवा कोणत्याही रस्त्यावरून पायी जात असताना फोनवरून युजरला तो कोठे आहे, ठराविक ठिकाणी जाण्यासाठी कुठे वळायला हवे, वाहतुकीची स्थिती कशी आहे याची सर्व माहिती हा फोन प्रत्यक्ष सांगणार आहे.
भारतात यापूर्वीही नोकिया, टॉमटॉम तसेच मॅप माय इंडिया अशा कांही कंपन्यांनी ही सेवा उपलब्ध करून दिली होती मात्र त्यात केवळ मॅपिंग होते, आवाज येत नसे. केवळ रस्ता दाखविणे इतकाच त्याचा उपयोग होता. आता मात्र रस्ता सांगताना आसपासच्या खुणा, तसेच तेथे जाताना कोणती काळजी घ्या याच्या सूचनाही मिळणार आहेत. या सेवेत अनेक पर्यायही देण्यात आले आहेत .युजर त्यातून आवश्यक तो पर्याय निवडू शकणार आहे. अतिशय अचूक अशी ही प्रणाली असून हे मॅप सेव्हही करता येणार आहेत. जीपीएस चीपचा वापर यात करण्यात आला असून हे स्मार्टफोन जगभर लोकप्रिय ठरले आहेत.
गुगलने नुकतेच बर्याच भारतीय शहरांसाठी ट्रान्झीट घेतले आहे. ट्रान्झीट म्हणजे संबंधित शहरातील सार्वजनिक वाहतूक विभागाकडून घेतलेला डेटा. उदाहरणार्थ दिल्ली मेट्रोसंबंधीचा डेटा. यामुळे युजरला सार्वजनिक वाहतूक सेवा कुठे आहे, बस तसेच ट्रेनच्या वेळा, जवळचे स्टेशन ही माहितीही मिळू शकणार आहे. मुंबई, बंगलोर, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद अशा शहरांसाठी हे ट्रान्झीट गुगलने घेतले आहे. अमेरिकेप्रमाणे अथवा युरोपिय देशांप्रमाणे भारतातील रस्ते ऑरगनाईज्ड नाहीत त्यामुळे गुगलला अनेक वर्षे या अॅपसाठी संशोधन करावे लागले आहे आणि त्यामुळेच भारतात ही सेवा देणे शक्य होत असल्याचे समजते.