
गंगोत्रीच्या पाठोपाठ नांव येते ते यमुनोत्रीचे. हिमालयातील चारधाम यात्रेतील हे महत्त्वाचे स्थळ. हृषीकेशपासून उत्तरकाशी ला यायचे आणि तेथून यमुनोत्रीसाठी रवाना व्हायचे. उत्तरकाशी-धरासू -यमुनोत्री असा हा खडतर प्रवास आहे. हिमालयातील प्रवास मुळातच अवघड त्यातील यमुनोत्रीचा तर विशेष अवघड. आपण यमुनोत्री असा उच्चार करतो तर उत्तरेकडे जमुना किंवा जमुनोत्री असा उच्चार केला जातो.समुद्रसपाटीपासून साधारण ३२०० मीटर ऊंचीवरचे हे स्थान.

बडकोटपासून साधारण २० किमीवर लागणारे लाखामंडल थोडा वाकडा रस्ता करून पाहायलाच हवे असे ठिकाण. अवघड घाट रस्त्याने गेल्यानंतर डोंगरात कौरव पांडवांच्या असंख्य मूर्ती दिसतात. येथील मंदिर पांडवांनी बांधल्याचे सांगितले जाते. मंदिर अतिशय प्राचीन आणि दरवाज्यावर बारीक कोरीवकाम केलेले आहे. शेजारीच उघड्यावरच असलेले प्रचंड शिवलिंग म्हणजे नवलच आहे. या शिवलिंगावर पाणी ओतले की ते आरशासारखे पारदर्शी होते आणि आजूबाजूच्या प्रतिमा त्यात स्पष्ट उमटतात. परतीच्या प्रवासात दोन तीन किलोमीटरवर एक भुयाराचे तोंड दिसते. लाखामंडल याच ठिकाणी पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न झाला होता आणि या भुयारातून ते सुखरूप सुटून गेले अशी कथा सांगितली जाते.

बडकोटपासून पुढे ब्रह्मखाल नावाचे एक छोटे खेडे किवा वस्ती आहे. येथे जमदग्नीचे मंदिर आणि कल्पवृक्ष पाहायला मिळतो. संपूर्ण रस्ता डोंगराळ असला तरी या गावाजवळ शेती पाहायला मिळते. जंगलाची सोबत कुठेच सुटत नाही. नंतर लागते हनुमान चट्टी. येथे वाहने उभी करता येत नाहीत म्हणून सयानचट्टीला खाली वाहने उभी केली जातात. हनुमानचट्टी छोटीशीच जागा असून यमुनोत्रीला जाण्यासाठी येथे मुक्काम करता येतो. येथे सपाट जागा अगदी कमी. त्याच्यापुढे पाच किमीवर जानकीचट्टी आहे. येथेही मुक्काम करता येतो. हनुमानचट्टीपासून खासगी वाहने पुढे नेता येत नाहीत. त्यामुळे हनुमानचट्टीपासून जानकीचट्टीपर्यंत जीपने व नंतर पायी अथवा घोडा, कंडीदंडी, डोली असा प्रवास करून यमुनोत्री गाठायचे. भल्या पहाटे निघावे लागते. जानकीचट्टीपासून वर सहा किमी अंतर चढून गेल्यानंतर यमुनेचे देऊळ आहे.

