मुंबई: छत्रपती शिवाजी टर्मिनस हिंसाचार प्रकरणावरून वादाच्या विळख्यात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी सत्यपाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आसाम आणि म्यानमारमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रझा अकादमीने काढलेल्या मोर्चात झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याचा आरोप नाहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केले. खुद्द पोलीस दलातही आयुक्तांबद्दल नाराजी असल्याची बाब या निमित्ताने पुढे आली.
त्यामुळे पटनायक यांची बदली अपेखीतच होती. त्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील आग्रही होते. मात्र ठाकरे यांना त्याचे श्रेय मिळू नये यासाठी ही बदली काही काळ पुढे ढकलावी; अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका असल्याचीही चर्चा होती.
मात्र पटनायक यांना महासंचालक पदावर बढती देऊन त्यांना रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर पाठविण्यात आले आहे. ही बदली हा प्रशासकीय भाग असल्याचे गृहमंत्री पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.