अहमदाबाद: ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना आश्रमातील दोन मुलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशी आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. बुधवारपर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश बापूंना देण्यात आले.
बापूंच्या अहमदाबाद येथील आश्रमात शिक्षणासाठी राहत असलेल्या दीपेश आणि अभिषेक वाघेला यांचे मृतदेह जुलै २००८ मध्ये आश्रमाच्या जवळ साबरमती नदीच्या पात्राजवळ विच्छिन्न अवस्थेत सापडले होते.
या मुलांचा मृत्यू तांत्रिक विधींमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा तपास गुजरात राज्य गुप्तचर विभागाच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला. मात्र या तपासात दिरंगाई होत असून आसाराम बापूंना वाचविण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप झाल्याने या तपासासाठी निवृत्त न्यायाधीश डी. के. त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला. मात्र आसाराम बापू या आयोगासमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
आसाराम बापूंची गाडी बिघडल्याने ते उपस्थित राहू शकत असल्याचे कारण देऊन त्यांच्या वकिलांनी पुढील तारखेला ते हजर होतील; अशी ग्वाही आयोगाला दिली.