
चित्रपटांसाठी गीते लिहून भरपूर पैसा कमावणार्या गीतकारांची नावे आपल्याला पाठ आहेत. मराठीत जगदीश खेबुडकर, प्रविण दवणे आदी नावे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर हिंदीमध्ये शकील बदायुनी, आनंद बक्षी, जावेद अख्तर, गुलजार, प्रसून जोशी ही नावे आता सर्वपरिचित झालेली आहेत. परमेश्वरांनी या लोकांना काव्य प्रतिभेची देणगी दिलेली असते. त्यामुळे त्यांना कविता करता येतात आणि अशा कविता करता करता कधी तरी त्यांनी चित्रपटातल्या एखाद्या विशिष्ट प्रसंगाची गरज ओळखून त्या प्रसंगावर गीत करून दिलेले असते आणि बघता बघता या व्यक्तीला ही खुबी माहीत झालेली आहे हे लक्षात आले की, चित्रपट निर्मार्त्यांची त्यांच्याकडे रिघ लागते. त्यांना मग पैसा, प्रसिद्धी यांची काही वानवा भासत नाही. त्यांचे यश बघून अनेक तरुणांना आपणही असेच गीतकार म्हणून प्रसिद्धीस यावे असे वाटत असते. तसा विचार केला तर हे करिअर करण्यासाठी मुळात प्रतिभाशक्तीची गरज आहे. ज्याच्या अंगी ही उपजत शक्ती नसेल तो या क्षेत्रामध्ये काहीच करू शकणार नाही.