आबांना काढून दादांनी टगेगिरी दाखवावी: राज ठाकरे

मुंबई: महाराष्ट्रात पोलिसांवर हल्ले होत असतील आणि महिला पोलिसांचा विनयभंग होत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेचे काय; असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृह विभागावर तोफ डागली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गृहमंत्रालय घेऊन टगेगिरी दाखवावी; अशी मागणीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

छ्त्रपती शिवाजी टर्मिनसवरील हिंसाचार पूर्वनियोजित होता या पोलिसांच्या शोधाची त्यांनी खिल्ली उडविली. सलीम लाईटवाला आणि अल्लाउद्दीन बिहारी हे साथीदारांसह हत्यारांची जमवाजमव करीत असल्याची माहिती वांद्र्याच्या एका महिलेने मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप करून ठाकरे यांनी पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांचा समाचार घेतला.

आर आर आबांना गृहखाते समजलेच नाही; अशी टीका करून ठाकरे यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी सोमवारपर्यंत राजीनामा न दिल्यास मनसेच्या वतीने गिरगाव चौपाटी पासून मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment