भारतीय बाजारात स्वस्त टॅब्लेटचा पूर

नवी दिल्ली दि.१३- किमतींच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भारतीय बाजारपेठेत कांही विशिष्ट फिचर्ससह आलेल्या स्लीक आणि स्वस्त टॅब्लट संचांनी ब्रँडेड कंपन्यांच्या टॅब्लेट्सपुढे मोठेच आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे..गेल्या कांही महिन्यात या फारश्या प्रसिद्ध नसलेल्या कंपन्यांनी तयार केलेल्या टॅब्लेट्सचा भारतीय बाजारात अक्षरशः पूर आला असून भारतीय ग्राहकांकडून या टॅब्लेट्ना चांगली मागणीही आहे.

गार्टनर रिसर्च संस्थेतील संशोधक व विश्लेषक विशाल त्रिपथी यांच्या म्हणण्यापुसार गतवर्षीपासून भारतीय बाजारपेठेत टॅब्लेट्च्या विक्रीत वाढ नोंदविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता ग्राहकांकडूनही या टॅब्लेट्सना मोठी मागणी आहे. विम्यासारख्या क्षेत्रांकडून टॅब्लेटचा वापर सुरू करण्यात आला आहे तसेच शैक्षणिक संस्थांकडूनही टॅब्लेट्समध्ये विशेष रूची दाखविण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत सुमारे तीन लाख टॅब्लेटस विकले गेले आहेत आणि यंदा त्यात २५ टक्के वाढ होईल असे संकेतही मिळत आहेत.

फ्रॉस्ट अॅन्ड सुलिव्हन कंपनीने आपल्या अहवालात भारतीय बाजारपेठेत २०१७ पर्यंत २ कोटी ३४ लाख टॅब्लेट्सची विक्री होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर अर्नेस्ट अॅन्ड यंग इंडिया कंपनीचे भागीदार नील सेठ यांनी भारतात टॅब्लेटचे आकर्षण मोठे असल्याचे मत व्यक्त केले आहे. सीमलेस कनेक्टीव्हिटीमुळे अनेक पर्यायही उपलब्ध झाल्याचे सांगून ते म्हणाले की टॅब्लेटबाबत एकंदर भारतीय समाधानी आहेत. अर्थात टॅब्लेट्स सोबत अॅप्स नसतील तर ते लोकप्रिय होणार नाहीत कारण भारतीयांना वस्तू खरेदी करताना त्याचा उपयोग ही महत्त्वाची बाब वाटते. सध्या बाजारात जे टॅब्लेट्स आहेत, त्यावर खूप अॅप्स उपलब्ध नाहीत पण ज्या टॅब्लेट्सवर अॅप्स आहेत, त्यांना चांगली मागणी आहे. छोट्या कंपन्यांनीही असे अॅप्स उपलब्ध करून दिले तर पाहतापाहता या कंपन्या ब्रँडेड कंपन्यांना विक्रीत मागे सारतील अशी लक्षणे दिसत आहेत.