हत्यांमागे अनैतिक संबंध मुख्य कारण?

मुंबई दि.८ – गेल्या वर्षात म्हणजे २०११ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ३०५ हत्या झाल्याची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने दिली असून  यातील जास्तीत जास्त हत्या ह्या अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. एकतर्फी प्रेम आणि अनैतिक संबंध यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत  आहे. आणि यातून घडणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत असल्याचा हा पुरावाच आहे.

जाणकारांच्या मते शहरी जीवनातील ताणतणाव, दारिद्य्र आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांमधून माणूस पिचलेला असतो. त्यातून प्रेमभंगातील अपयश पचविणे अवघड जाते. त्यातून अशा घटना अलीकडे वाढल्या आहेत. प्रेम प्रकरणाच्या खालोखाल पूर्ववैमनस्यातून २०१ जणांच्या हत्या झाल्याचे आकडेवारी सांगते. देशात इतरत्र पूर्ववैमनस्यातून सर्वाधिक हत्या झाल्याचे समोर आले आहे तर दुसर्‍या क्रमांकावर प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येचा समावेश आहे.

मालमत्तेच्या वादातून १४७ जणांचा तर हुंडाबळीतून ११३ जणांचा जीव गेला आहे.  सूड, दहशतवाद किंवा कट्टरवाद हीसुद्धा एखाद्याचा खून करण्यामागची मुख्य कारणे आहेत. गेल्या वर्षी २०११ मध्ये महाराष्ट्रात एकूण २,८१८ खुनाचे गुन्हे नोंदले गेले. त्यातील १,९१६ खुनांमागे इतर  कारणे असल्याचे उघड झाले आहे.

Leave a Comment