पंडितांनी काश्मीर सोडून जावे: अतिरेक्यांची धमकी

श्रीनगर: काश्मिरी पंडितांनी सात दिवसात काश्मीर सोडून जाण्याचे फर्मान जैश ए मुहम्मद या दहशतवादी संघटनेने काढले आहे; तर पोलिसांनी पंडितांना दिलासा देण्यासाठी दहशतवाद्यांच्या विरोधात तीव्र मोहीम छेडली आहे.

काश्मीरमधून विस्थापित झालेल्या पंडितांनी पुन्हा काश्मीरमध्ये परतावे असे आवाहन करणारया उमर अब्दुल्ला सरकारला अतिरेक्यांनी हे फर्मान काढून आव्हान दिले आहे. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करून अतिरेक्यांचे आव्हान स्वीकारण्याची तयारी केली आहे. मात्र जैश ए मुहम्मदचा हा फतवा म्हणजे प्रत्यक्षात सुरक्षा दलांचा कट आहे. सुरक्षा दले काश्मिरी पंडित आणि मुस्लीम यांच्यात फूट पडू इच्छितात; असा आरोप काही संघटनांनी केला आहे.

काश्मिरी पंडित काश्मीरमध्ये बिगर मुस्लीम चळवळींना प्रोत्साहन देत आहेत; त्याचप्रमाणे सुरक्षा दलांशी हातमिळवणी करून ‘जिहाद’ रोखू पहात आहेत. त्यामुळे त्यांनी सात दिवसात काश्मीर सोडून निघून जावे; अशी धमकी बडगाम जिल्ह्यातील शेखपोरा येथे काशिरी विस्थापितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या गृहसंकुलाच्या अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आली आहे. यामुळे काश्मिरी पंडीतांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Leave a Comment