भारत आवडतो, पण येथे व्यवसायसंधी कमी – टीम कुक

अॅपलचा सीईओ टीम कुक याने भारतावर आपले प्रेम आहे मात्र आमच्या उत्पादनांसाठी येथे व्यवसायाच्या संधी कमी आहेत असे मत व्यक्त केले आहे. गुंतवणूकदार व विश्लेषकांशी कॉन्फरन्सिंग करताना तो बोलत होता. कुक म्हणाला की भारत मला आवडत असला तरी माझा असा विश्वास आहे की भारतापेक्षा अन्य देशांत आम्हाला व्यवसायाच्या संधी अधिक प्रमाणात आहेत. याचा अर्थ आमचे भारतावर लक्ष नाही असा घेऊ नये. येथेही आमचा व्यवसाय आहे, तो वाढतोही आहे पण म्हणावी तशी प्रगती त्यात झालेली नाही.

भारतात अॅपल फार यशस्वी का नाही असा एका विश्लेषकाने टीमला सवाल केला होता, त्याचे उत्तर देताना टीम बोलत होता. अॅपलने त्यांच्या ताळेबंदातील तिसर्‍या क्वार्टरचे निकाल जाहीर केल्यानंतर हा कॉन्फरन्स कॉल झाला. कुक म्हणाला की भारतातील वितरण पद्धती मल्टी लेअर्ड असल्याने उत्पादनांची किमत वाढते. स्मार्टफोन हे क्षेत्र प्राईस सेन्सिटीव्ह मार्केट म्हणून ओळखले जाते.भारतात कंत्राट मॉडेल सिस्टीम नाही त्यामुळे स्मार्ट फोन उत्पादकांना विक्रीबाबत एकमेकांशी स्पर्धा करावी लागते. अॅपल पुरवठा चेन व उत्पादन वितरणावर स्वतःचे नियंत्रण असण्यास प्राधान्य देते. व त्यामुळे भारतात आमचा व्यवसाय कमी आहे. तुलनेने चीन आमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

भारतात स्मार्टफोन क्षेत्रात सॅमसंगचे वर्चस्व असून त्यांचा मार्केट शेअर ४५ टक्के आहे. त्यापाठोपाठ नोकिया आणि ब्लॅकबेरी फोन विकणार्‍या आरआयएमला अधिक पसंती ग्राहक देतात. अॅपलचा भारतीय बाजारातील शेअर एकआकडीच आहे. डिसेंबर ११ मध्ये अॅड्राइडचा वाटा ४२ टक्के होता तर आयफोन चा वाटा ३ टककेच होता. तुलनेने अॅपलच्या टॅब्लेटला भारतात बरी मागणी आहे असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे