मानेसर संपाचा बोध

भारतामध्ये मोटारकारच्या उत्पादनामध्ये क्रमांक एकवर असलेल्या मारुती सुझुकी या कारखान्यामध्ये गेल्या आठवड्यात काही हिंसक घटना घडल्या. त्यामुळे या कारखान्यातले उत्पादन ठप्प झाले आणि कारखान्याला प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. हरियाणाच्या मानेसर या शहरानजिक असलेल्या औद्योगिक विभागात हा कारखाना आहे. तिथे गेल्या तीन वर्षांपासून अधूनमधून संप व्हायला लागले आहेत. या संपांमुळे गतवर्षी या कारखान्याचे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. या कारखान्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची स्विप्ट ही डिझेल कार तयार केली जात असते. ती डिझेलवर चालत असल्यामुळे तिला प्रचंड मागणी आहे. मात्र कारखान्यात सातत्याने संप होत असल्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम झालेला आहे. मानेसरच्या या औद्योगिक अशांततेचे नेमके कारण काय, यावर बराच खल जारी आहे. कंपनीचे व्यवस्थापन यावर आपले मत व्यक्त करताना एक गोष्ट आवर्जून सांगत आहे ती म्हणजे हा संप पगारवाढीसाठी नाही आणि ही गोष्ट खरीही आहे.
 
एखाद्या कारखान्यामध्ये संप व्हायचा म्हटला, की तो पगारवाढीसाठीच असणार असे आपण गृहित धरत असतो आणि ही वस्तुस्थिती सुद्धा आहे. कारण तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी साधारणत: पगारासाठीच काम करत असतात आणि त्यामुळे पगार हेच त्यांचे उद्दिष्ट असते. पगारात होणारी वाढ, मिळणारे भत्ते, जादा कामाचा पगार हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात आणि त्यात काही कमी-जास्त झाले की कामगार संपाला उद्युक्त होतात. मात्र मानेसर येथील मारुती सुझुकी कंपनीचा संप तसा नाही. मग तो नेमका काय आहे, यावर बरीच चर्चा चाललेली आहे. सध्या आपल्या देशामध्ये संपांचे प्रमाण फार कमी झालेले आहे. कारण देशाचे औद्योगीकरण वेगाने होत आहे आणि त्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ म्हणावे तेवढे निर्माण होत नाही. त्यामुळे नोकरी करणे ही कामगारांची गरज आहेच पण कामगार मिळणे ही कारखानदारांची अधिक गरज झालेली आहे. म्हणावे तसे आणि म्हणावे तेवढे कामगार मिळतच नाहीत, अशी कारखानदारांची तक्रार आहे. परिणामी १९७० आणि ८० च्या दशकामध्ये देशात जशी बेकारी जाणवत होती तशी आता राहिलेली नाही. कामगार तेवढा लाचार राहिलेला नाही. म्हणून कारखानदारांना कामगारांची पिळवणूक करण्याची संधी नाही. निदान वेतनात तर नाही.

कामगारांना बर्‍यापैकी वेतनाची कामे मिळत आहेत. म्हणून वेतनाच्या मागणीसाठी संप होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु सरकारचे कामगारविषयक कायदे हे कामगारांच्या असंतोषाचे एक कारण व्हायला लागले आहे. केवळ वेतन चांगले मिळाले म्हणून माणूस स्थिर होतो असे नाही. चांगले वेतन आणि स्थिर नोकरी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. नाही तर पगार छान मिळतो, पण उद्या नोकरी राहणार आहे की नाही हे आज सांगता येत नाही इतकी ती अस्थिर असते. तर अशा नोकरीतल्या छान पगाराचे काही कौतुक रहात नाही. कोणत्याही माणसाला नोकरी कोठे आहे यावरून समाजात सन्मान मिळत असतो. त्यातल्या त्यात मारुती कारखान्यामध्ये नोकरी करतो म्हटल्यानंतर त्याच्याकडे लोक आदराने पाहतात. परंतु ती नोकरी मध्येच गेली तर लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून प्रत्येक कामगाराला नोकरीची निश्‍चिती आवश्यक वाटत असते. सध्या सरकारचे कामगार कायदे ही नोकरी निश्‍चिती देत नाहीत. पूर्वीच्या कामगार कायद्यात ती होती. परंतु आता सरकारने कामगारांना कधीही नोकरीवरून काढण्याचा अधिकार कारखानदारांना दिलेला आहे. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रातले कामगार नोकरीच्या बाबतीतल्या अनिश्‍चिततेमुळे अस्वस्थ झालेले आहेत.

भारतामध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांनी सरकारला कामगार कायदे बदलण्याची अट घातलेली आहे आणि सरकारने ती मान्य करीत हायर ऍन्ड फायर नीती अवलंबिण्याची मुभा गुंतवणूकदारांना दिलेली आहे. या पुढे तुम्ही कामगारांना तुमच्या गरजेनुसार नेमा आणि गरज नसेल तेव्हा हाकलून द्या, कायदा किंवा सरकार त्यामध्ये अडचण आणणार नाही अशी अनुमती आता दिलेली आहे. त्यामुळे भारतातल्या बर्‍याच गुंतवणूकदारांनी आपल्या कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार नेमायला सुरुवात केलेली आहे. कंपनीमध्ये काम असेल, कंपनीला नफा असेल तोपर्यंत तुमची नोकरी सुरू. पण कंपनीला तोटा झाला, कंपनीच्या मालाची मागणी कमी झाली की तुमच्या नोकरीचे काही खरे नाही. अशावेळी कामगारांनी काय करावे? कोणत्याही क्षणी घरी बसण्याची पाळी येणे ही गोष्ट फार तापदायक असते. कारण घरी बसण्याची पाळी आली की, घराचे भाडे, मुलाचे शिक्षण आणि रोजची उपजीविका याचे प्रश्‍न गंभीर होतात. या अनिश्‍चिततेमुळेच केवळ मानेसरचेच नव्हे तर इतरही अनेक कारखान्यांतील कामगार अस्वस्थ जीवन जगत आहेत आणि त्यातूनच संपासारखे प्रकार उद्भवत आहेत.