’दादा’ सुटले भन्नाट!

मुंबई,१४ जुलै-ग्रामीण भागात सिंचन क्षेत्रात का झाली आहे? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय काय सुचू शकतात. पाऊस कमी पडला आहे, पाण्याची योग्य साठवणूक झाली नाही, अशी साधीसुधी उत्तरं तुम्हा-आम्हाला सुचतील. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र एक याच प्रश्नावर एक भन्नाट उत्तर सुचले आहे आणि तेच उत्तर त्यांनी विधानसभेतही मांडले आहे.

श्वेतपत्रिकेची घोषणा
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्धारापुढे राष्ट*वादी काँग्रेस अखेर झुकली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सिंचनाची श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सिंचनाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. सिंचनावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

विरोधकांना उत्तर देताना दादांना आपल्या डोक्याला जराही त्रास द्यावासा वाटला नाही. ’दादां’च्या म्हणण्यानुसार ’ग्रामीण भागातही शौचालयावर भरमसाठ पाणीवापर केला जातो. हा पाणीवापर ज्यादा असल्याने त्याचा सिंचनावर परिणाम झाला आहे. म्हणजेच शौचालयांमुळे ग्रामीण भागातले सिंचन घटले आहे.’ गेल्या दहा वर्षांत पिण्याच्या आणि शैचालयाच्या पाण्याचा वापर वाढल्याने सिंचनाची टक्केवारी कमी झाली असल्याचेही अजित पवारांनी नमूद केले आहे.

विधान परिषदेत सिंचनाच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. सिंचनावर आतापर्यंत ४२ हजार ४०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली. मात्र, यावरून विरोधकांनी सरकारवर एकच हल्लाबोल केला. सिंचनात या व्यतिरित्त* २३ हजार ८०० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी केला आहे.