भारतात आश्रय द्या- पाक शिपायाची मागणी

जम्मु/नवी दिल्ली,दि. १२ – जम्मू-काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यात एका पाकिस्तानी सैनिकाला अटक करण्यात आली आहे. या सैनिकाचे म्हणणे आहे की, पाकिस्तान कंगाल झाला आहे. त्यामुळे भारताने त्याला आश्रय द्यावा. पोलिसांनी या सैनिकाकडून १३ हजार रुपये, दोन सीम कार्ड, सिव्हील आय कार्ड आणि रजेचे प्रमाणपत्र जप्त केले. या सैनिकाचे नाव आरिफ अली असून, तो पाकिस्तानी सैन्याच्या २५ व्या फ्रंटियर फोर्सचा जवान आहे. १९ वर्षांच्या आरिफला भारतीय सैनिकांनी जेव्हा अटक केली, तेव्हा तो साध्या कपड्यात होता. तसेच त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र सापडले नाही.

आरिफने चौकशीत तो क्वेट्टा प्रातांतील रहिवासी असून, त्याच्या बटालियनने वाईट वागणूक दिल्याने बटालियन सोडली, असे म्हटले आहे. त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर दबाव टाकत असल्याचेही त्याने सांगितले. जम्मू-काश्मिर पोलिस त्याने दिलेल्या जबाबाची तपासणी करीत आहेत. पाकिस्तानने सैनिकाला परत पाठवण्याचे आवाहन भारताला केले आहे.