महानगरी मुंबईने नोंदविला सर्वात कमी लोकसंख्या वाढ दर

मुंबई दि.१२- महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबानगरीने विश्वास बसू नये अशी कामगिरी बजावली असून गेल्या दशकात या नगरीने गेल्या १०० वर्षातील सर्वात कमी लोकसंख्या वाढ दर नोंदविला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जनगणनेच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अहवालानुसार मुंबईत २००१ ते २०११ या सालात लोकसंख्या वाढीचा दर५.७५ टक्कयांनी घटला आहे. उपनगरांतील लोकसंख्या गेल्या दहा वर्षात ८ टक्कयांनी वाढली असली तरी एकूण लोकसंख्या वाढीच्या दरात घटच झाली आहे.
 
जागतिक लोकसंख्या दिवसाच्या निमित्ताने हा अहवाल सादर करण्यात आला असून या घटीमागे अनेक कारणे लोकसंख्या शास्त्रज्ञ देत आहेत. कुंटुंबाचा लहान झालेला आकार, आर्थिक राजधानीत झालेले सॅच्युरेशन, रोजगारांच्या घटलेल्या संधी, न परवडणारे घरांचे दर अशी ही कारणे आहेत. जनगणनेचा स्थलांतर संबंधित डेटा अजून प्रकाशित झालेला नाही. तो प्रकाशित झाल्यानंतर या घटीवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स चे प्रमुख पी.आरोक्यसामी यांनी मुंबईतील लोकसंख्या दरवाढीचा वेग पुढच्या दशकात कदाचित शून्य किवा शून्याखाली जाईल असा अंदाज दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा जागतिक ट्रेंड आहे. कोणत्याही शहराचा विकास होत असताना तेथील लोकसंख्या वाढीचा दर अधिक असतो मात्र नंतर तो घटत जातो. पन्नासच्या दशकात मुंबईत हा दर अगदी पीकवर होता तर उपनगरात हाच दर ५० ते ८० ज्या दशकात अधिक होता. मुंबईची आजची लोकसंख्या १ कोटी २४ लाख असून गेल्या पाच वर्षात पाच लाख नागरिकांची भर पडली आहे.

मुंबईतील जागांचे दर जसे वाढू लागले तसे उपनगराकडे नागरिक गेले परिणामी नवी मुंबई, वाशी, ठाणे येथील लोकसंख्या वाढली आहे. गेल्या कांही वर्षात मुंबईत नवीन उद्योग आलेले नाहीत परिणामी रोजगार संधी कमी झाल्याने लोकसंख्या स्थिर राहते आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे.