
मुंबई दि.१२- महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबानगरीने विश्वास बसू नये अशी कामगिरी बजावली असून गेल्या दशकात या नगरीने गेल्या १०० वर्षातील सर्वात कमी लोकसंख्या वाढ दर नोंदविला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जनगणनेच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अहवालानुसार मुंबईत २००१ ते २०११ या सालात लोकसंख्या वाढीचा दर५.७५ टक्कयांनी घटला आहे. उपनगरांतील लोकसंख्या गेल्या दहा वर्षात ८ टक्कयांनी वाढली असली तरी एकूण लोकसंख्या वाढीच्या दरात घटच झाली आहे.
जागतिक लोकसंख्या दिवसाच्या निमित्ताने हा अहवाल सादर करण्यात आला असून या घटीमागे अनेक कारणे लोकसंख्या शास्त्रज्ञ देत आहेत. कुंटुंबाचा लहान झालेला आकार, आर्थिक राजधानीत झालेले सॅच्युरेशन, रोजगारांच्या घटलेल्या संधी, न परवडणारे घरांचे दर अशी ही कारणे आहेत. जनगणनेचा स्थलांतर संबंधित डेटा अजून प्रकाशित झालेला नाही. तो प्रकाशित झाल्यानंतर या घटीवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.