‘राम लीला’मधून करीना बाहेर

करीना कपूर आणि संजय लीला भन्साळी यांचे एकमेकांबरोबर काम करायचे गेले १३ वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर धुळीस मिळाले आहे. ‘हिरॉइन’ सिनेमानंतर करीना ताबडतोब संजय लीला भन्साळी यांच्या `राम लीला’ या सिनेमात रणवीर सिंगसोबत काम करणार होती. मात्र, आता करीना या सिनेमात काम करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

करीनाचा मॅनेजर झाहिद खान याने स्पष्ट केले की करीनाकडे पुरेशा तारखा नसल्यामुळे आणि तिला मिळणार असलेले मानधन समाधानकारक नसल्यामुळे करीना या ‘राम लीला’मधून बाहेर पडली आहे. अर्थात खरं कारण काय आहे, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. बेबो राम लीलामधून बाहेर पडल्यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त होत आहे. करीना आणि भन्साळी एकमेकांसोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. करीनाने तर संजय लीला भन्साळी म्हणजे आजच्या पीढीतील राज कपूर आहेत, असे म्हणत आपल्या महान आजोबांशीही भन्साळींची तुलना केली होती. मात्र एवढं होऊनही करीनाचे स्वप्ने पूर्ण झाले नाहीच.

‘हम दिल दे चुके सनम’ या भन्साळी यांच्याच सिनेमातही १३ वर्षांपूर्वी ऐश्वर्याऐवजी करीनाला घेण्यात आले होते. तो करीनाचा पहिला सिनेमा ठरणार होता. मात्र, करीनाचे त्रासदायक वागणं, ऍटिट्यूड आणि पैशांवर डोळा ठेवून काम करणं भन्साळींच्या प्रकृतीला मानवले नाही, आणि अखेर करीनाची `हम दिल दे चुके सनम’ मधून गच्छंती झाली होती. १३ वर्षांनी कारण वगळं असले तरी करीना-भन्साळी एकत्र येऊनही पुन्हा काम न करताच विभक्त झाले आहेत. `राम लीला’साठी आता प्रियंका चोप्राची वर्णी लागली आहे. मात्र आता पुन्हा बेबो आणि भन्साळी एकत्र येऊन कधी काम करतील, याची चाहते वाट पाहातच राहातील.

Leave a Comment