
दरवर्षी पावसाळा सुरू होतो आणि पावसामध्ये काही अनियमितता जाणवली की, सरकार दुष्काळाच्या निमित्ताने काही उपाययोजना करायला लागते. हा दरवर्षीचा शिरस्ता झालेला आहे. पाऊस पडला तर ठीकच. पावसाच्या पडण्यानुसार शेतीभाती पिकत राहील आपण काही करण्याची गरजच नाही. मात्र पाऊस पडला नाही तर थोड्या हालचाली करून दुष्काळाचे निवारण करण्याचा आव आणायचा, केंद्राची मदत, राज्याची मदत यांची चर्चा करायची, शेतकर्यांना उघड्यावर सोडणार नाही अशी वल्गना करायच्या, थोड्या जनावरांच्या छावण्या काढायच्या आणि हे सारे करता करता थोडासा पाऊस पडला की, पुन्हा पहिले पाढे पंचावन. हीच आपल्या राज्यकर्त्यांची शेती व्यवसायाच्या बाबतीतली नीती, भूमिका आणि धोरण आहे. वारंवार दुष्काळ पडत आहेत, त्याचा काही तरी कायमचा बंदोबस्त केला पाहिजे या दृष्टीने वैज्ञानिकांना सोबत घेऊन आणि जनतेचा सहभाग वाढवून काही योजना राबवल्या पाहिजेत याबाबत केंद्र सरकारही गंभीर नाही आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुद्धा याबाबत सारा आनंदीआनंद झाला आहे.
