भारतातल्या ८२ पक्षांचे अस्तित्व धोक्यात

पणजी, दि. ५ –  भारतातल्या ८२ पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने ही माहिती दिली आहे. अस्तित्व धोक्यात आलेल्या पक्षांपैकी १३ प्रजाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरणाचा समतोल साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या पक्षांच्या जाती वाचवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पर्यावरणातल्या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे भारतातल्या ८२ जातीच्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यातले ४७ प्रकारचे पक्षी धोकादायक स्थितीत आहेत. तर १३ पक्षांच्या प्रजाती तर नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते. यात महाराष्ट्रात सापडणारा वनपिंगळा, पांढर्‍या पुठ्ठ्याचे गिधाड, भारतीय गिधाड, जॉर्डन कोर्सर आणि माळढोक पक्षांचा समावेश आहे. तर पिंक हेडेड डक, सोशेबल लॅपविंग, हिमालयीन क्विल, बेंगाल फ्लोरिकन हे पक्षीही संकटग्रस्त झालेत. अस्तित्त्व धोक्यात आलेल्या पक्षांपैकी आठ पक्षी फक्त भारतातच आढळतात, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. असद रेहमानी यांनी दिली आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. याच पक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्याने याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होणार आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी पक्षी संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.