पावणेतीनशे वर्षे पूर्ण करीत आहे पुण्याचे ओंकारेश्वर मंदीर

omkareshwar

पुणे – नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरु यांचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग अशी आगळीवेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओंकारेश्‍वर मंदिर सोमवारी (दि. २) आपल्या स्थापनेची २७४ वर्षे पूर्ण करीत आहे.  नर्मदेवरुन आणलेल्या बाणाची शिवलिंगाची तांबड्या पाषाणाच्या साळुंख्यामध्ये प्रतिष्ठापना झाली,तो आषाढ शुद्ध त्रयोदशीचा दिवस हा योग साधून हे पेशवेकालीन मंदिर २७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

Omkareshwara-Temple

पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. गाय उतारी शिवालया करविले,असा त्याचा पेशवे दप्तरामध्ये उल्लेख असल्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली. अवघा खर्च पेसवियांनी केला. कामकाजाचे पारपत्य चित्रावशास्त्री यांनी केले, असेही पेशवे दप्तरामध्ये नमूद केले आहे. पेशव्यांतर्फे ओंकारेश्‍वराला दरवर्षी १३५० रुपये अधिक साडेसात रुपये इतके अनुदान दिले जात होते. याखेरीज महाशिवरात्रीला एक हजार रुपये स्वतंत्र दिले जात असत. त्याकाळी सोने १५ रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम किती असावी याचा अंदाज येतो, असेही त्यांनी सांगितले.
Omkareshwara-Temple1
मंदार लवाटे म्हणाले, मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत. अन्य मंदिरांमध्ये कीर्तीमुख उंबरठ्यात असतो. ओंकारेश्‍वर मंदिरामध्ये मात्र, कीर्तीमुख कळसामध्ये आहे. मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम असे म्हटले जाते. स्वातंत्र्यलढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. महर्षी व्यास, दत्तगुरु, दोन सिंह आणि चार साधूंची शिल्पे कळसामध्ये आहेत. पानशेत पुरामध्ये या साधुंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते. तसेच मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. हा नंदी पुन्हा आणून बसविण्यात आला. यामध्ये नंदीचे शिंग तुटले असून कालांतराने ते शिंग फायबरचे बसविण्यात आले आहे. मंदिरामध्ये गेली ५० वर्षे दर सोमवारी चक्याची पूजा बांधली जात आहे. वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. तर, गुढीपाडवा, दिवाळी आणि वसंत पंचमी या सणांना पेशवेकाळापासूनचा मुखवटा आणि पोषाख परिधान करून देवाला सजविले जाते. १९७० पर्यंत ओंकारेश्‍वर परिसरात स्मशान होते. अजूनही तेराव्याला दीपदान करून सूतक पूर्ण करण्याच्या प्रथेचे पालन केले जाते. पुलाच्या उभारणीमुळे स्मशानाचे स्थलांतर झाल्यानंतर ओंकारेश्‍वराच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. जागृत देवस्थान असल्याचा अनुभव भाविकांना येतो.

ओंकारेश्‍वर मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी भजन, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून भाविकांना प्रसाद वाटप होणार आहे. विश्‍व हिंदू परिषदेने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी २५ लाख रुपयांचा निधी संकलित करण्याचा संकल्प केला आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांनी केले आहे.

Leave a Comment