आभाळाकडे डोळे

जून महिना संपत आला. अजून पेरणी नाही. ती कधी होईल याची काही शाश्‍वती नाही. महाराष्ट्रातले लाखो वारकरी ( जे प्रामुख्याने शेतकरीच असतात) महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानीकडे विटेवर उभ्या असलेल्या काळ्या परब्रह्माच्या दर्शनाच्या ओढीने पायी चालले आहेत. त्यांची मने पूर्ण भक्तीने भरली आहेत. पण त्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. त्यांच्या पोटाला धान्य देणारे खरे काळे परब्रह्म तिथे बसले आहे पण ते काही बरसत नाही. जीवाला घोर लागून राहिला आहे. आपण मुक्त अर्थव्यवस्थेची वाट धरून औद्योगीकरणाकडे मोठी घोडदौड सुरू केली असली तरी अजूनही आपली अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून असते म्हणूनच पावसाने  गुंगारा देताच केवळ शेतकरीच नव्हे तर सारे अर्थविश्‍व चिंताग्रस्त झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊस वेळेवर पडेनासा झाला आहे. गतवर्षी तो कमी पडला आणि सार्‍या महाराष्ट्राला पाण्याच्या किती भीषण टंचाईला तोंड द्यावे लागत आहे याचा आपण अनुभव घेतच आहोत. पण आता यंदाही पाऊस नीट पडला नाही, तर मोठे संकट कोसळल्यागत होईल अशी भीती, स्वच्छ आभाळाकडे पाहून मनात दाटून यायला लागली आहे. सलग दुसरे वर्षी दुष्काळ पडतो की काय,  अशी शंका मनात दाटून यायला लागली आहे.  तसे झाल्यास महाराष्ट्राचे सामाजिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. दुष्काळ पडल्यास ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होत नाही आणि ग्रामीण भागातले लोक मोठ्या संख्येने शहराकडे स्थलांतर करायला लागतात. १९७२, १९८४ आणि २००३ या तीन वर्षांत पडलेल्या दुष्काळांनी  महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची पूर्ण वाताहत झाली असून लाखो खेडुत मोठ्या शहरांच्या आश्रयाला गेले आहेत. खेडी ओस पडत आहेत.

शहरांत गेलेल्या लोकांना तिथे रोजगार मिळून त्यांच्या पोटाची सोय होते. पण जीवन जगण्यास आवश्यक अशा मुलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यांच्या शिवायच हे लोक शहरांमध्ये रहात असतात. शहरांना बकाल करत असतात.  याला दुष्काळ कारणीभूत आहे. सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. दुष्काळाच्या संकटातून आपली सुटका होणार आहे की नाही, हाच  प्रश्‍न सर्वांना सतावत आहे. पूर्वी  मृग नक्षत्राचा पाऊस धो धो बरसून जायचा. असे एक-दोन पाऊस पडले की, पेरणीची घाई सुरू व्हायची. मृग नक्षत्र संपता संपता पेरण्या आटोपलेल्या असायच्या आणि आर्द्रा नक्षत्राच्या उन्हाने वाढीस लागलेल्या पिकाला सूर्यप्रकाशाचे अन्न मिळायचे. आता सारे वेळापत्रकच विस्कटून गेले आहे.  शेतकर्‍यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे. हेही नक्षत्र कोरडे गेले की, शेतकर्‍यांचे विस्थापन सुरू होईल. पावसाचे विस्कटलेले वेळापत्रके सुधारणे आपल्या हातात नाही. त्याचा अंदाज घेऊन आपल्या शेतीचे वेळापत्रक बदलणे मात्र आपल्या हातात आहे. पाऊस त्याच्या लहरीने पडणार आहे, आपण त्याच्या लहरीचा अभ्यास करून आपली शेती अधिकात अधिक कशी पिकवता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या शेतीचे वेळापत्रक आणि तंत्रज्ञान पावसानुसार ठरत असते. सुदैवाने माणसाला असे बदल करण्याइतकी बौद्धिक क्षमता प्राप्त झालेली आहे. तिचा वापर करून आपण आपली शेती बदलत्या हवामानात सुद्धा कशी छान करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कमी पाऊस पडला म्हणजे दुष्काळच पडावा असे काही नाही. परंतु पावसाचे आणि शेतीचे तंत्रज्ञान ज्ञात नसलेले लोक पावसाचा आणि दुष्काळाचा असा संबंध जोडत असतात. शेतीची विभागणी खरीप आणि रबी अशा दोन हंगामात न करता मध्य हंगाम नावाचा एक प्रकार करावा लागेल. पाऊस उशिरा पडला तरीही ऑगष्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पेरूनही उत्तम पीक येईल असे पीक घेतले पाहिजे. कारण आता दरवषींच उशीरा पाऊस पडायला लागला आहे. आपण कमी पाऊस पडला की दुष्काळ पडला असे म्हणतो. पण  भरपूर पाऊस पडला तरीही आपण तसेच म्हणतो केवळ कोरडा दुष्काळ ऐवजी ओला दुष्काळ म्हणतो. 

एकंदरीत नेहमी दुष्काळच. म्हणजे त्यांच्या मनात दुष्काळ असतो. जे लोक पावसाच्या लहरीनुसार शेतीचे तंत्रज्ञान बदलतात त्यांना कधीच दुष्काळ जाणवत नाही. म्हणूनच आता पाऊस कितीही लांबला तरी यातूनही आपण काय करू शकतो याचा आणि याचाच विचार केला पाहिजे. इस्रायलमध्ये आपल्यापेक्षा किती तरी कमी पाऊस पडतो. पण तिथे कधीच दुष्काळ नाही.  त्यांना ते शक्य होते आणि आपल्यालाच का होत नाही? याचे कारण असे की आपल्या मनाने दुष्काळाशी सामना करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पाऊस कितीही पडो मात्र आपली शेती छान पिकेलच असा निर्धार आपण केला तर दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे. पाऊस कमी पडो की जास्त पडो, पडलेल्या पावसाचा थेंब अन् थेंब आपण जमिनीत जिरवला तर दुष्काळाचे काही कारणच नाही. फक्त पाणी जिरविण्याची दक्षता मात्र घ्यायची आहे. एवढे माहीत असूनही दुष्काळ का पडतो? याचे एक कारण म्हणजे पाणी जिरविण्याचे हे शाश्‍वत स्वरुपाचे काम आपण करायचे नसून सरकार येऊन करणार आहे, असा आपला समज आहे. तो समज दूर झाला पाहिजे.

Leave a Comment