मंत्रालयात नागरिकांना बंदी, कामकाज सुरू

मुंबई,दि. २५ – मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली. ग्रामविकास सचिव एस. एस. संधू यांच्या कार्यालयातून उपमुख्यमंत्र्यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे. मंत्रालयात पुढचे सात दिवस सर्वसामान्य जनतेला प्रवेश मिळणार नाही.

आगीनंतर पहिल्यांदाच मंत्रालयात कामकाज सरू झाले आहे. तसेच पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठकही झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर माहिती दिली. नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व शासकीय इमारतींचे फायर ऑडिट होणार आहे.तसेच ज्या इमारतींचे ऑडिट झाले आहे. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगीमध्ये मंत्रालयातले २ हजारपैकी ९० टक्के कॉम्प्युटर्स जळाल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. तर कामकासाठी ४ ठिकाणी पर्यायी जागा मिळाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

अग्निकांडानंतर आज मंत्रालय पुन्हा गजबजले. साठ ते ६५ टक्के कर्मचारी मंत्रालयात असतील. बाकीच्या कर्मचार्‍यांची इतर ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. जनतेत विश्वास निर्माण व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मंत्रालयातूनच काम पाहणार आहेत.

Leave a Comment