टी-२० वर्ल्डकपच्या आव्हानासाठी `युवराज’ सज्ज

दुबई, दि. २० – कॅन्सरसारख्या आजारातून सावरून भारतीय क्रिकेटफॅन्सच्या गळ्यातला ताईत बनलेल्या `युवराज’ चे लवकरच मैदानात आगमन होणार आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये होणार्‍या टी-२० वर्ल्डकप खेळायची, त्याची स्वत: ची इच्छा आहे. या मॅचसाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होणे हे एक आव्हान असल्याची त्यालाही जाणीव आहे. पण, त्याबरोबरच या मॅचसाठी आपण नक्कीच मैदानात उतरु, हा विश्वासही त्याच्या मनात आहे.

टीम इंडियासाठी खेळणे हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान असेल. कारण माझं शरीर ज्या प्रसंगातून जात आहे ते कदाचित मलाच समजू शकेल. कॅन्सरवरच्या उपचारांदरम्यान शरीर प्रचंड थकले आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत, असे युवीने `आयसीसी क्रिकेट ३६० डिग्री’ या कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

भारताचा डावखुरा फलंदाज असलेल्या युवीने आपण नेमके कधी मैदानात परतणार, हे स्पष्ट सांगितले नसले तरी त्यासाठी घाई करणार नसल्याचेही त्याने सांगितले आहे. शरीर जसे साथ देईल तसा मी मैदानात परण्याचा प्रयत्न करेन, मला अजिबात घाई नाही आणि ७५टक्के फिटनेसच्या जोरावर मैदानात परण्याची माझी इच्छा नाही, असेही त्याने म्हटले आहे. यासाठी सहा महिन्यांची वेळ लागू शकतो किंवा दोन महिन्यांचाही. पण, जेव्हापर्यंत मला स्वत:ला मी फिट आहे, असे वाटत नाही तेव्हापर्यंत मी मैदानात परतणार नाही, असा ठाम निश्चयही युवीने व्यक्त केला आहे.

भारत याही वर्षी विश्वविजेती टीम बनेल, असा विश्वास युवीला आहे. आपल्या आजाराबद्दल बोलताना युवी तितकाच भाऊक झाला. `माझ्यासारखा ६-७ तास अभ्यास करणारा आणि एखाद्या एथलीटसारका नेहमी धावत राहणार्‍या व्यक्तीला कॅन्सरसारखा आजार झाला आहे हे स्विकार करणे सुरुवातीला खूप अवघड गेले. हे सत्य स्विकारण्यासाठी मला खरंतर खूप वेळ लागला. उपचारादरम्यान वेगवेगळ्या हितचिंतकांकडून खूप धीर मिळाला. ज्यामुळे मी आजारातून लवकर सावरू शकलो.’ २००७ सालच्या आयसीसी टवेन्टी -२० वर्ल्डकप चॅम्पियन स्पर्धेत स्टुअर्ट ब्राडच्या एका षटकात युवीने मारलेले सहा षटकार आजही त्याच्या फॅन्सच्या लक्षात आहेत. त्यामुळेच तो २०१२चा वर्ल्डकप टी-२० खेळणार की नाही, ही उत्सुकता फॅन्सलाही लागलेली आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाचा फेव्हरिट असल्याचेही युवीने आवर्जून सांगितले. गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केल्यास आपला संघ सगळ्यात भक्कम संघ असेल, याकडेही त्याने लक्ष वेधले. अर्थात, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेला कमी लेखून चालणार नाही, असा सल्लाही त्याने दिला.

Leave a Comment