काळ्या पिवळ्या टॅक्सी होणार बंद?

मुंबई, १५ – मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात दिसणारी काळी पिवळी पद्मीनी टॅक्सी बंद होण्याची शक्यता आहे. १५ ते २५ वर्ष जुन्या टॅक्सी रस्त्यावरुन हळूहळू कमी करण्याचा विचार सध्या आरटीओ अधिकारी करीत आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या धावणार्‍या या प्रीमीयर पद्मीनी टॅक्सी बंद पडणार आहेत.

सध्या मुंबईत दीड हजार प्रीमीयर पद्मीनी टॅक्सी असुन त्या १५ ते २५ वर्षापुर्वीच्या आहेत. या टॅक्सीची वयोमर्यादा २५ वर्षे असते. या टॅक्सीच्या स्थितीबद्दल अनेक प्रवाश्यांनी तक्रार केली होती. अनेक टॅक्सीच्या सिट फाटलेल्या आणि अस्वच्छ असतात. तसेच या टॅक्सीची दरवाजे आणि हॅन्डल्सचीही स्थिती खराब असल्याच्या तक‘री अनेक प्रवाश्यांची केल्या आहेत. या टॅक्सी लवकरात लवकर बंद करण्यात याव्यात अशी मागणीही अनेक प्रवाशी करत आहेत. जर असे झाले तर सर्व टॅक्सी चालकांना नवीन टॅक्सी घ्याव्या लागतील, अशी माहिती एका आरटीओ अधिकार्‍यांनी दिली.

तसेच सर्व काळ्या पिवळ्या टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे केले जाणार आहेत. सध्या तरी या पद्मीनी टॅक्सीला इलोक्ट्रॉनिक मीटर असणे सक्तीचे नसल्याने अनेक वेळा या सध्या मॅकेनिकल मीटरमध्ये फेरफार करुन प्रवाशांना लुबाडण्यात येते. आरटीओने अशा मीटरसंबंधीत तक्रार नोंदवण्यासाठी सुरु केलेल्या १८००-२२-०११० या हेल्पलाइन नंबरवर अनेक प्रवाशी प्रीमीयर पद्मीनी टॅक्सी चालक मीटरमध्ये फेरफार करत असल्याचे सांगितले आहे.
सरकारने या संदर्भात एक परिपत्रक काढावे. त्यामुळे चांगल्या सेवेबरोबरच प्रदुषण करणारी जुनी वाहने शहरातील रस्त्यांवरुन चालवण्यास बंदी घालता येईल असे मत आरटीओच्या एका अधिकार्‍याने व्यक्त केले.

मात्र टॅक्सी युनियनने या गोष्टीला विरोध दर्शवत आरटीओ अशाप्रकारे टॅक्सी भंगारात काढण्याचा विचार कसा करु शकते ?, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. बर्‍याच टॅक्सी चांगल्या स्थितीत असुन त्या जास्त प्रदुषणही करत नसल्याचा दावा युनियनने केला आहे.

अशाप्रकारे टॅक्सी बंद केल्यास अनेक टॅक्सीचालक बेरोजगार होतील आणि त्यांच्यासमोर कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्‍न उभा राहिल, असे मत टॅक्सी युनियनच्या नेत्याने व्यक्त केले आहे. तर सर्वच टॅक्सीचालकांना नवीन टॅक्सी विकत घेणे शक्य होणार नाही. सरकार जोपर्यंत सुलभ कर्ज योजना लागू करत नाही तोपर्यंत अनेक टॅक्सीचालक नवीन टॅक्सी घेऊ शकणार नाहीत, असे मत दुसर्‍या एका टॅक्सी युनियन नेत्याने मांडले. मुंबई टॅक्सी युनियनचे ए. एल. क्वाड्रोस यांनी फक्त दोन वर्षाचाच प्रश्‍न असुन २०१४ ला सर्वच टॅक्सी मोडीत काढण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली. रिक्षाचालकांप्रमाणे आम्ही टॅक्सी युनियनने काधीही इलोक्ट्रॉनिक मीटरला विरोध केला नव्हता ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यायला हवे. आम्ही नेहमीच आरटीओला सहकार्य केले आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी ही आमच्या गरजांची जाणीव ठेवावी अशी आशा क्वाड्रोस यांनी व्यक्त केली आहे.