राज्यव्यापी दौरा करुन अण्णा हजारे राळेगणसिध्दीत

अहमदनगर, दि. ९ – लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा देशात प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, कायदा हातात घेऊन केलेले कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. सक्षम जनलोकपालसाठी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण राज्यातील जिल्हयांचा दौरा उरकून हजारे शुक्रवारी सायंकाळी नगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी या आपल्या गावी पोहचले.

गावात पोहोचताच हजारे यांनी आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार संत यादवबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हजारे यांच्या ताफ्यातील एका गाडीवर हल्ला करुन काचा फोडल्या तसेच राज्यात काही ठिकाणी हजारे विरोधात आंदोलने करण्यात आली.

त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता हजारे म्हणाले, समाजहित डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापितांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळाला ही खूपच समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे लवकरच जनलोकपाल व काळ्या पैशाच्या विरोधात संपूर्ण देशव्यापी दौर्‍याचे नियोजन केले जाणार आहे. सक्षम जनलोकपाल, राज्यांमध्ये लोकायुक्त विधेयक व परदेशात दडविण्यात आलेला काळा पैसा सरकारने देशात परत आणवा यासाठी देशव्यापी दौर्‍याचे जनजागृती केली जाणार असल्याचे हजारे यांनी यावेळी सांगितले.