अपयश ही यशाची पहिली पायरी – भरत आंधळे

nitin

एका खासगी कंपनीत साधा कामगार म्हणून राबणार्‍या एका तरुणानं एक मोठं स्वप्न पाहिलं अन् आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या स्वप्नाला सत्यात उतरवलं. अनेक छोटय़ा-मोठय़ा नोकर्‍या, कष्टाची कामं करीत त्याने परिस्थितीवर मात केली आणि तो भारतीय पोलीस सेवेत दाखल झाला. सामान्यातला सामान्य तरुणही पेटून उठला तर काय चमत्कार घडवू शकतो हे त्याने सर्वांना दाखवून दिले. या संघर्षमय प्रवासाबाबत भरत आंधळेशी किरण केंद्रे यांनी केलेली ही बातचीत…

प्रश्न- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं म्हणतात याबाबत तुझा काय अनुभव आहे?
उत्तर- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं म्हणतात पण एखादी व्यक्ती जर सलग दहा वर्षे अपयशी होत असेल तर ती व्यक्ती भोवतालच्या लोकांच्या हेटाळणीचा विषय ठरते. उठता बसता त्याला टोमणे खावे लागतात. नको नको ते सल्ले ऐकावे लागतात. माझ्या बाबतीतही हेच झाले. वर्षानुवर्षे खडतर परिश्रम करुनही पदरात यशाचे दान काही पडत नव्हते. त्यामुळे अनेकांच्या टिकेचा विषय झालो. पण ध्येय निश्चितपणे माहित असलेल्याने हार मानली नाही. कारण मला माहित होते की गमावण्यासारखे आपल्याजवळ काहीही नाही. कमावण्यासाठी मात्र सारं आकाश मोकळ आहे. कारण ज्या परिस्थितीतून आलो ती पाहता एखादी छोटी मोठी नोकरी मिळवणं ही देखील खूप मोठी गोष्ट होती. पण मी स्वप्न पाहिलं सनदी अधिकारी होण्याचं. अन् सलग दहा वर्षाच्या कठीण तपश्चर्येनं ते सत्यात उतरवून दाखविलं. आज आयपीएस अधिकारी झालो आहे.

प्रश्न- प्रशासकीय सेवेत जायचे हा निर्धार कधी केला त्यास कुटुंबातील वातावरण पुरक होते का?
उत्तर- मी नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील ठोणगाव या छोटय़ाशा गावातील. तुटपुंज्या कोरडवाहू शेतीवर उदरनिर्वाह करणारं हे कुटुंब. मी अभ्यासातही जेमतेमच. त्यात दहावीला अवघे ५४ टक्के गुण मिळाले. दहावी पास झालेला मी घरातला पहिलाच. मग कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नोकरी करायचे ठरविले. त्यासाठी आयटीआयचा कोर्स पूर्ण केला आणि नाशिक येथील हिंदूस्थान फास्टनर या कंपनीत कामगार म्हणून रुजू झालो. नोकरी करत असतानाच मनात मात्र वेगळेच विचार सुरु होते. आपल्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, यावर ठाम होतो. यासाठी काम करतानाच बहिस्थ:विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि पदवी मिळविली. आयुष्यभर कामगार म्हणून न राहता आता मोठी झेप घ्यायला हवी हे मनोमन ठरविले. या विचार मंथनातच प्रशासकीय सेवेचा मार्ग दिसला. आपल्याला प्रशासकीय सेवेत जायचे हा निर्धार करीत कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट पुणे गाठले.

प्रश्न- या परीक्षांची तयारी कशाप्रकारे केली, यासाठी कोणाकोणाचे मार्गदर्शन लाभल?
उत्तर- पुढचा प्रवास जास्त कठीण होता. कारण स्वत:च्या पायावर उभं राहत स्पर्धा परीक्षेची तयारी करणं सोपं नव्हतं. त्यात सुरुवातीचे काही दिवस तर शिवाजीनगरच्या बस स्थानकावर मुक्काम ठोकावा लागला. पुढे पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मित्राने आसरा दिला. अशातच बहिस्थ विद्यार्थी म्हणून एम.ए.ला प्रवेश मिळविला आणि विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागलो. अभ्यास तर सुरु झाला पण पैशाचे काय ? दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली मग पुणे विद्यापीठाच्या `कमवा व शिका` योजनेत नाव नोंदवले. रोज चार तास शारीरिक कष्टाचे काम करायचे. त्याचे दिवसाला ४० रुपये मिळायचे. पहाटे ४.३० ते ८.३० विद्यापीठ आवारातील झाडांना पाणी घालणे, झाडलोट करणे अशी काम करायचो. उरलेला वेळ फक्त अभ्यास. ध्यास एकच सनदी अधिकारी व्हायचे. स्वत:च्या केवळ गुणवत्तेच्या बळावर परिस्थिती बदलायची. पुढच्या काळात येतील त्या परीक्षा देऊ लागलो. एमपीएससी, बँकिंग, एलआयसी अशा प्रकारच्या परीक्षेसाठी प्रयत्न करु लागला. २००५ साली प्रयत्नांना यशही मिळाले. पीएसआय झालो. पण समाधान नव्हते यूपीएससीच उत्तीर्ण व्हायचे होते. मग पीएसआय च्या ट्रेनिंगला गेलोच नाही. पुन्हा अभ्यास सुरु केला. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करीत ज्ञानसाधना सुरुच ठेवली. पुढे यूपीएससीची तयारी करण्यासाठी मुंबईची वाट धरली आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळविला.

यूपीएससीचा प्रवास खडतर होता. पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षाही पास होऊ शकलो नाही. पण हार मानली नाही. लढतच राहीलो. नंतर मुख्य परीक्षेपर्यंत, मुलाखतीपर्यंत पोहचलो. पण तिथे अपयश आल्यामुळे पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. दिवस चालले होते. अशातच एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून निवड झाली. ही नोकरीही सोडली. आणि २००९ च्या परीक्षेसाठी तो नव्या जोमाने पूर्ण जोशात मैदानात उतरलो. यावेळी मात्र परिस्थितीलाच नतमस्तक व्हावे लागले.
पूर्व-मुख्य-मुलाखत असे तीनही टप्पे लीलया पार करत अंतिम निवड यादीत स्थान मिळविले. भारतीय पोलीस सेवेत (I.P.S.) त्याची निवड झाली. एक दशकाच्या खडतर परिश्रमाला यश आले.

प्रश्न- या यशाचे खरे मानकरी कोण आहेत?
उत्तर- आपले हे यश एकटय़ाचे नसून यामागे अनेकांच्या प्रेरणा व प्रार्थना आहेत विशेषत: जयपाल कांबळे यांनी केलेली मदत व प्रोत्साहन आयुष्य बदलवणारे ठरल्याचे नम्रपणे सांगतो. विशेष म्हणजे घडविण्यात आजीचा मोठा वाटा आहे. ती नसती तर मी इथवर आलोच नसतो, ह्याची जाणीव आहे माझा भरत शिकतो आहे म्हणून स्वत:ला नवीन लुगडं-चोळी न घेणार्‍या आजीचा प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच आपल्या यशाची पहिली बातमी आजीलाच कळवली. मुंबई येथील राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत (SIAC) मिळालेले मार्गदर्शनही त्याच्या दृष्टीने मोलाचे ठरले.

आयपीएस पदावर निवड होऊनही मी स्वस्थ बसलो नाही. हैद्राबाद येथे प्रशिक्षणासाठी जाण्यापूर्वी एक अभिनव उपक्रम राबविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती करुन देण्यासाठी महाराष्ट्रभर फिरलो. या प्रवासात ७० ठिकाणी व्याख्यान दिले. गरीब, होतकरु मुलांना सनदी अधिकारी होण्याची प्रेरणा दिली.

भरत आंधळेचा आजवरचा प्रवास विलक्षण संघर्षाचा आहे. ध्येयाच्या दिशेने अविरतपणे प्रवास करणारा हा तरु ण कधीच खचला नाही. प्रत्येक अपयशाला एक नवी संधी मानत तो चालत राहिला. अखेर यशाने त्याच्यासाठी पायघडय़ा अंथरल्या. मी ज्या परिस्थितीतून आलो तिनेच मला लढायला शिकविल्याचे तो अभिमानाने सांगतो. याच जिद्दीच्या बळावर भावी काळातही तो यशाची नवनवी शिखरे गाठणार यात संशय नाही.