पुन्हा माशी शिंकली

केंद्र सरकारचा आथिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कालच आळस झटकून कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मोठा  आर्थिक  कार्यक्रम हाती घेतला असल्याचे जाहीर केले होते. मुक्त अर्थव्यवस्थेची पावले टाकताना आता सरकार मागे राहणार नाही, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सोयीत मोठी गुंतवणूक करण्यास चालना देईल अशी ग्वाही दिली होती. या मागे कारण होते ते सरकारवरच्या आरोपांचे. हे सरकार आर्थिक कार्यक्रम राबवण्याबाबत विकलांग झाले आहे अशी टीका व्हायला लागली होती. सत्ताधारी काँग्रेसच्या व्यापक कार्यकारिणी अधिवेशनात पक्षाच्या सार्‍या नेत्यांनी झाडून  तशीच टीका केली होती. ही टीका झोंबल्याने का कोण जाणे पण अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आपले सरकार विकलांग नाही अशी ग्वाही दिली होती. ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत रेंगाळलेली विधेयके धडाधड हाती घ्यायचा निर्णयही झाला होता. त्यानुसार पेन्शन विधेयकाचा विचार प्राधान्याने करण्यात आला. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता पण, माशी शिंकली आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यातून हा विषय रद्द करण्यात आला.
   
असे का झाले ? पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी या विषयाला हरकत घेतली. या आधी विरोधी पक्षांच्या आणि मित्र पक्षांच्याही विरोधामुळे हे विधेयक प्रलंबित राहिले होते. भारतात आता निवृत्ती वेतन योजनांना गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तशी गती देताना सरकारने या विषयातून आपले अंग काढून घेतले होते. कारण सरकारला निवृत्ती वेतन हा प्रकार फार डोईजड झाला होता. काही वेळा सरकार आपल्या आता काम करणार्‍या कर्मचार्‍यांपेक्षा निवृत्त कर्मचार्‍यांना जास्त निवृत्ती वेतन द्यावे लागत होते.  आता ही जबाबदारी खाजगी कंपन्यांवर टाकण्यात येणार होती. पेन्शन मिळवू इच्छिणार्‍याने आपला वेतनातला काही हिस्सा खाजगी पेन्शन फंडात जमा करावा व त्यावर निवृत्त झाल्यावर पेन्शन मिळवावे अशी ही योजना आहे. सरकारने याही क्षेत्रात परदेशी खाजगी गुंतवणूक दारांना संधी द्यायचे ठरवले होते. म्हणजे कर्मचार्‍यांचे हे पैसे त्या कंपनीत जमा होतील. ती कंपनी त्या पैशाचा वापर कसाही करू शकेल किवा ते पैसे भारतातच गुंतवेल. त्या गुंतवणुकीतून काही नफा मिळो की न मिळो पण कंपनी कर्मचार्‍याला पेन्शन देण्यास बांधील राहील. या व्यवसायात परदेशी कंपन्या उतरल्या तर त्यांची गुंतवणूक भारतात होईल असा सरकारचा होरा होता.

सुरूवातीला भाजपाने या प्रस्तावाला विरोध केला होता पण आता त्यांनी तडजोड करण्याची तयारी दाखवली होती. या फंडात परदेशी कंपन्यांनी काही गुंतवणूक केली तर एकूण गुंतवणुकीच्या ४९ टक्के गुंतवणूक परदेशी कंपनीची असावी असा नियम करण्यात आला होता पण भाजपाने या प्रमाणाला विरोध केला. त्यावर सरकारने तडजोड केली आणि  ही परदेशी भांडवलाची मर्यादा ४९ वरून २६ वर खाली आणली. तसे केल्यास हे विधेयक मंजूर करण्यास  भाजपाचे सहकार्य मिळेल असे आश्वासन भाजपा नेत्यांनी दिले होते. त्यामुळे सरकारने या विधेयकाचा आग्रह धरला होता. पण ऐनवेळी तृणमूल काँग्रेसने आपला या विधेयकाला असलेला विरोध कायम असल्याचे सरकारला कळवले. शत्रू पक्षाने साथ दिली पण मित्र पक्षाने अडथळा आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या मोहिमेला प्रतिबंध बसला. आपले सरकार हतबल झालेले नाही हा प्रणव मुखर्जी यांचा दावा पोकळ ठरला. सरकारला ममता बॅनर्जीमुळे या मोहिमेत माघार घ्यावी लागली. ममता बॅनर्जी यांनी सातत्याने सरकारच्या अशा पावलांना विरोध केलेला आहे कारण त्यांना आपल्या राज्यांत डाव्या पक्षासारखी आणि डाव्या पक्षा एवढी लोकप्रियता मिळवायची आहे. ती त्यांची राज्यातल्या राजकारणाची गरज आहे.
 
आता या विधेयकाला भाजपाचा पाठींबा मिळाला आहे मग ममता बॅनर्जी यांनी विरोध केला तरीही भाजपाच्या पाठींब्यावर सरकारला हे विधेयक मंजूर करवून घेता येते. मग सरकार तसे का करीत नाही ? कारण तसे केले तर ममता बॅनर्जी नाराज होतात. आता सरकार आपल्या कोणत्याही मित्र पक्षाला नाराज करू इच्छित नाही. कारण तसे केल्यास त्याचा परिणाम राष्ट्रपतींच्या आणि  लोकसभेच्या  निवडणुकीवर होऊ शकतो. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालातले आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवलेले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत तिथे काँग्रेसने ममता बॅनर्जी यांचे वैर मोल घेतले आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर काँग्रेसची मजल तिथे पाच जागांच्या पुढे जाणार नाही. बिहारात असेच लालूंना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लालू तर पराभूत झालेच पण काँग्रेसलाही पाच जागांवर समाधान मानावे लागले. तसा प्रसंग बंगालात येऊ नये म्हणून ममतांशी वैर घेता येत नाही. सरकार खरोखर हतबलच आहे. ममता पुढे त्यांना सातत्याने लोटांगण घालावे लागत आहे. आता असे अनेक प्रस्ताव मागे टाकत सरकारला मुक्त अर्थव्यवस्थेचीच वाट सोडावी लागते की काय असा प्रश्न पडला आहे. मनमोहनसिंग यांच्या भांडवलशाही धोरणात डाव्या पक्षांपेक्षा ममता बॅनर्जी यांनीच अधिक अडथळा आणला आहे.