नुपूर तलवार यांची फेरयाचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली, दि. ७ – सर्वोच्च न्यायालयाने ६ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी विनंती करणारी जी फेरयाचिका नुपूर तलवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती, ती न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावली. या संदर्भात आणखी तपास करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायायलाने म्हटले की, आरूषी आणि हेमराज खून प्रकरणी आतापर्यंत जे पुरावे गोळा करण्यात आले आहेत, ते पुरेसे असून खालच्या न्यायालयात हा खटला चालविण्यासाठी आता आणखी चौकशीची आवश्यकता नाही.

सध्या नुपूर तलवार कारागृहात आहेत. १५ आणि १६ मे २००८ च्या रात्री तलवार दाम्पत्याची मुलगी आरूषी आणि त्यांचा घरगडी या दोघांची हत्या झाली होती. या हत्याकांडासंदर्भात तलवार दाम्पत्यास आरोपी करण्यात आले आहे. आरूषीचे वडील राजेश तलवार हे मात्र सध्या जामीनावर सुटले आहेत.