मानव जातीचा पायावर धोंडा

माणूस हा या सृष्टीतला सर्वात प्रगत प्राणी आहे, असे समजले जाते. पण ही समजूत माणसानेच निर्माण केली आहे आणि माणूसच ती वाढवत असतो. त्याची ही समजूत खरी आहे का खोटी आहे हे त्याने तपासून पाहिलेले नाही किवा या सृष्टीतल्या अन्य प्राण्यांना या प्रगत मानवापासून काही फायदा होतो का आणि तो प्रगत असल्याचे या अन्य प्राण्यांना मान्य आहे का, हे कोणी त्या अप्रगत प्राण्यांना विचारलेले नाही. वास्तविक पाहता या पृथ्वीतलावर किंवा सृष्टीमध्ये एकटा मनुष्यप्राणी रहात नाही. इतरही अनेक प्राणी आहेत. परंतु माणूस हा इतका आत्मकेंद्रित आणि स्वार्थी प्राणी आहे की, तो ही सारी सृष्टी आपल्यासाठीच असल्याचे समजून वागत आहे. माणसाने अन्य कोणत्याही प्राण्याच्या प्रगतीसाठी कधी प्रयत्न केलेले नाही. उलट त्या प्राण्यांचा आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या चैनीसाठी कसा वापर करता येईल याचाच तेवढा प्रयत्न केलेला आहे. या मानव प्राण्याने अन्य प्राण्यांनाच नव्हे तर सार्‍या सृष्टीलाच ओरबाडून आपली हौस भागवली आहे. या निसर्गाने मानवाच्या आणि इतर सर्व प्राण्यांच्या सुखसोयीसाठी आणि जगण्यासाठी जे काही दिले आहे ते सारे बेमुर्वतखोरपणे वापरण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे या माणसाला काही काळ सुख मिळालेही असेल किवा अजून मिळतही असेल, मात्र त्याच्यावर आता पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. कारण सृष्टीमध्ये त्याच्या सुखासाठी जे काही उपलब्ध आहे ते सारे त्याच्या हावरटपणामुळे संपुष्टात येत चालले आहे. आता आपल्या सुखसोयींकरिता काय वापरावे याचा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा आहे. एवढेच घडलेले आहे असे नाही तर हा निसर्ग त्याला हावरटपणाची शिक्षा सुद्धा करत आहे. त्याने जमिनीच्या पोटात दडलेली ऊर्जा साधने प्रचंड प्रमाणात वापरली आहेत. परंतु कोणतेही ऊर्जा साधन हे कायमचे नष्ट होत नसते. केवळ ऊर्जा साधनच नव्हे तर या सृष्टीतली कोणतीही वस्तू कायमची नष्ट होत नसते. मूलद्रव्यांचा हा मूलभूत गुणधर्मच आहे. एखादा कागद आपण जाळला तर तो कागद म्हणून नष्ट होईल पण राखेच्या स्वरुपात का होईना तो शिल्लक राहील. शिवाय जाळल्यामुळे त्याचा जो धूर होतो तो हवेत मिसळून दुसर्‍या स्वरुपात का होईना शिल्लक राहतोच. मुळात हा कागद त्याच्या पूर्वी बांबूच्या रुपात शिल्लक असतो. एकंदरीत या जगातली कोणतीही वस्तू अविनाशी आहे.
    
पेट्रोल, डिझेल अशी ऊर्जा साधने मानवाने जमिनीतून उकरून काढली आणि त्यांचा वापर केला. परंतु वापर करून ही तेले जाळली तरी त्यांचा धूर होऊन तो हवेत मिसळून राहतो. मात्र तसा तो मिसळताना हवेला प्रदूषित किंवा अशुद्ध करून टाकतो. एकंदरीत मानव प्राणी जसजसा सुधारत चाललेला आहे आणि अधिकाधिक ऊर्जेचा वापर करायला लागला आहे तसतशी त्याने आपल्या-भोवतीची हवा विषारी करून टाकली आहे आणि सुधारणेच्या नावावर केलेल्या प्रगतीतून स्वतःच्या समोर हवेच्या प्रदूषणाचे नवे संकट उभे केले आहे. ही गोष्ट केवळ इंधन तेले आणि हवा यांच्याच बाबतीत घडली आहे असे नाही तर इतरही अनेक बाबतीत घडलेली आहे. मानवाने प्रगती करण्यासाठी कारखाने काढले, कारखान्यांमुळे शहरे वाढली, शहरांमुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढले आणि हे सांडपाणी या प्रगत मानवाने जलाशयांमध्ये सोडून दिले. काही ठिकाणी हे सांडपाणी जमिनीत मुरले. त्यामुळे जलाशयेही अशुद्ध झाली आणि जमिनीच्या अंतर्गत असलेले जलसाठे सुद्धा प्रदूषित होऊन मानवाच्या आरोग्याला धोकादायक झाले. हवा, पाणी इत्यादींचे हे प्रदूषण मानवाच्या मुळावर आलेले आहे आणि त्याने केलेली प्रगती त्याच्यावरच भस्मासूरासारखी उलटली आहे. प्रगतीच्या नावावर हे सारे घडले.
 
एका बाजूला प्रगती झाली, पण दुसर्‍या बाजूला आरोग्याचे अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले. आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने पर्यावरणाच्या सर्व अंगांचा मुळातून विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रगतीच्या नावावर केवळ हवा आणि पाणीच नव्हे तर निसर्गाने दिलेल्या इतरही अनेक गोष्टींचे मानव प्राण्याने नुकसान केलेले आहे. त्यामध्ये माती आहे आणि जंगले सुद्धा आहेत. पृथ्वीतलाच्या समुद्राचे पाणी व्यापलेल्या भागाला सोडून उरलेल्या भूभागावर ३३ टक्के जंगल असल्याशिवाय आणि त्यातील वन्य प्राण्यांना शिकारीपासून संरक्षण
मिळाल्याशिवाय मानवाचे जीवन सुखी होणार नाही. मात्र हे माहीत असून सुद्धा लोकांनी बेसुमार जंगलतोडही केलेली आहे आणि आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जंगलातल्या अनेक प्राण्यांच्या शिकारीही केलेल्या आहेत. त्यामुळे माणूस स्वतःच असुरक्षित होऊन गेलेला आहे. तो जोपर्यंत पर्यावरणाच्या रक्षणाचे काम गांभीर्याने करत नाही तोपर्यंत तो सुखी-समृद्ध होऊ शकणार नाही. हा संदेश या मूढ प्राण्यांपर्यंत पचविण्यासाठी आज पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.

Leave a Comment