नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या

नागपूर, दि. २- नक्षलवाद्यांनी १ ते ७ जून दरम्यान बंद पुकारला असून गडचिरोली जिल्ह्यात आपली दहशत कायम राहावी यासाठी नक्षलवाद्यांनी परत घातपाती कारवायांना सुरुवात केली आहे. एटापल्ली तालुक्यातील जराबंडी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन मडावी यांच्यावर गोळ्या झाडून नक्षलवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. 

गजानन मडावी हे तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील तंटे मिटविण्याचे काम करीत होते. त्यांची पत्नी  पंचायत समिती सदस्य आहे. गुरुवारी रात्री दोन नक्षलवादी मोटरसायकलवर त्यांच्या घरी आले. त्यांनी दार ठोठावले. दरवाजा उघडताच नक्षलवाद्यांनी गजानन मडावे यांना घराबाहेर खेचले. व त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांच्या पत्नीसमक्ष त्यांना ठार केले.

गावात आपली दहशत कायम राहावी या हेतूनेच नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १ मे रोजी या गावाला भेट दिली होती. तेव्हापासून नक्षलवाद्यांनी या गावाला लक्ष्य केले आहे. या प्रकरणी एटा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment